

डिचोली: पाणी समस्येने त्रस्त झालेल्या डिचोलीतील सावरधाट येथील धनगरवाड्यावरील संतप्त महिला भगिनींनी आज डिचोली येथील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या महिलांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करून आमचा पेयजलाची समस्या त्वरित सोडवा, अशी मागणी केली. फक्त दोन दिवसानंतर पाणी समस्येवर तोडगा काढू, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी संतप्त महिलांना दिले.
लाटंबार्से पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आणि धनगर बांधवांचा वाडा असलेल्या सावरधाट भागात गेल्या काही महिन्यांपासून पेयजलाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनियमित आणि मर्यादित पाणी पुरवठ्यामुळे वाड्यावरील धनगर बांधवांचे विशेष करून कष्टकरी गृहिणींचे अक्षरशः हाल होताना त्या रडकुंडीस येत आहेत. पाण्यासाठी धनगर बांधवांना वणवण करावी लागत असून, गृहिणींवर तर पाण्यासाठी डोळ्यांतून अश्रू गाळण्याची पाळी येत आहे. पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी सरकार गंभीरपणे लक्ष देत नाही. उलट फक्त आश्वासने देत आहेत, असा आरोप धनगर बांधव करीत आहेत.
सावरधाट येथील पाण्याची समस्या सोडवणे सोडाच, उलट या मुद्यावरून राजकारण करण्यात येत आहे. पाण्याच्या बाबतीत सावरधाट येथील जनतेची चक्क फसवणूक आणि दिशाभूल होत आहे. जनतेला पेयजल मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे कोणीही या प्रश्नी राजकारण करु नये. गेल्या जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र अजून कोणत्याच हालचाली होत नाही. आम्ही धनगर समाजातील आहोत, म्हणून आमच्यावर हा अन्याय होत आहे काय?असा सवाल दिलीप वरक यांनी व्यक्त केला.
गेल्या महिन्यात शिरगावच्या लइराई जत्रेच्या तोंडावर पाणी समस्येने त्रस्त झालेल्या वाड्यावरील धोंड भक्तगणांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिली होती. त्यानंतर पेयजलाची समस्या सुटणार, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अजूनतरी संबंधितांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. परिणामी पाणी समस्या कायम आहे, असे महिला धनगर भगिनींनी सांगितले. दैनंदिन जीवनातील मुख्य गरज असलेले पाणी जर वेळेवर आणि मुबलक प्रमाणात मिळत नसेल, तर दिवस कसे घालवायचे? असा प्रश्न या भगिनींनी उपस्थित केला.
सावरधाट भागात एक तर अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूने नळांना धड पाणी येत नाही. टँकरद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. कपडेलत्ते, भांडीकुंडी धुणे सोडाच, मुबलक पाणी सोडाच धड तांब्याभरही पाणी मिळत नाही. त्यामुळे पेयजलासाठी हाल सहन करावे लागत आहेत, अशी कैफियत लक्ष्मी झोरे आणि सखू झोरे यांनी व्यक्त केली.