

डिचोली: डिचोलीच्या चौपदरी बगलमार्गावरील नाईकनगर परिसरात धोकादायक अवस्थेत असलेली दरड आता अधिकच खचली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास दरड रेलिंग तोडून बगलमार्गावर कोसळण्याची भीती असून, संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी ती तातडीने हटवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
जून २०२४ मध्ये डिचोलीतील चौपदरी बगलमार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर लगेचच दोन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यानंतर धोका लक्षात घेऊन संबंधित भागातील कडा कापून बगलमार्ग सुरक्षित करण्यात आला. दरड कोसळलेल्या भागात जोडरस्ताही बांधण्यात आला. मात्र, नाईकनगर येथे बगलमार्गाच्या दिशेने खचलेली आणि कोसळण्याच्या स्थितीत असलेली दरड अद्याप ‘जैसे थे’ आहे.
गेल्यावर्षी जुलैमध्ये भर पावसात वाठादेव-व्हाळशी चौपदरी बगलमार्गावर ही मोठी दरड खचली होती. नाईकनगर परिसरात व्हाळशीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला खचलेली दरड सुदैवाने बगलमार्गावरील रेलिंगला अडकून राहिल्याने त्यावेळी मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेला वर्ष उलटून गेले तरी दरड हटविण्याकडे किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दरड त्वरित हटवा!
आता ही दरड आणखी खचली असून, पावसाच्या तडाख्यात रेलिंग तोडून बगलमार्गावर कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे बगलमार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरड तातडीने हटवून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी समीर वायंगणकर यांच्यासह वाहनचालकांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.