
साखळी: दिल्लीत केजरीवाल हे अहंकाराने माजले होते. दिल्लीतील भ्रष्टाचाराला लोकांनी नाकारत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. दिल्लीतील विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
दिल्लीत ‘आप’ने केंद्र सरकारच्या अनेक योजना चालीस लावायला दिल्या नव्हत्या. लोकांना या योजनांपासून वंचित ठेवण्याचे पाप केले होते. त्याचसाठी दिल्लीकरांनी ‘आप’चे सरकार उलथावून लावले, असे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पुढे सांगितले.
भाजप प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच साखळी भाजप कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुष्पहार घालून दामू नाईक यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार दाजी साळकर, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, मंडळ अध्यक्ष रामा नाईक आदींची उपस्थिती होती. कालिदास गावस यांनी सूत्रसंचालन केले.
गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा कारभार उत्कृष्टपणे चालला असून केंद्रातील सरकारचे मोठे सहकार्य गोव्याच्या सरकारला आहे. याच जोरावर गोव्यात विविध विकास प्रकल्प व कल्याणकारी योजना मार्गी लागत आहेत. देशात महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपने पूर्ण बहुमत मिळवत आपली छाप निर्माण केली आहे. गोव्यातही भाजपची लोकप्रियता मोठी असून येणाऱ्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत २७ अधिक जागा जिंकण्याचे ध्येय समोर ठेऊन काम करायला हवे, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हणत ‘२०२७ मध्ये २७ जागा’ हा नारा दिला.
गोव्यात भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावरच बळकट होत आहे. दामू नाईक हे नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दिलेला ‘२०२७ मध्ये २७’ हा नारा खरा करण्यासाठी साखळी मतदारसंघ हा प्रथम मतदारसंघ असेल. आजही पणजीतील कार्यालयात बैठक होते व संघटनेच्या कार्याबद्दल साखळी मतदारसंघातील संघटनात्मक कार्याची स्तुती होती. ही आपल्यासह प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे. कार्यकर्त्यांमधील हाच जोश व उत्साह २०२७ पर्यंत नव्हे, तर त्यापुढेही हवा. भविष्यात आम्ही असो किंवा नसो, पण हा देश आणि हा पक्ष अबाधित राहणार आहे. यासाठी पक्षात अनेक कार्यकर्ते जोडण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी जाण्याचा योग आला व आपली जबाबदारी आपण पार पाडली. आज दिल्लीतील भाजपचा विजय हा मनाला आनंद देणारा आहे. कारण खोटे जास्त काळ चालत नाही. यावेळी दिल्लीवासीयांना समजले होते ‘केजरीवाल झुठा है’, त्यामुळे दिल्लीतील लोक थेट ‘अबकी बारी, मोदीजी की बारी’ असे सांगत होते. त्याचप्रमाणे देशाच्या राजधानीत डबल इंजिन सरकार येणे काळाची गरज होती. हे डबल इंजिन सरकार २०४७ पर्यंत विकसित भारत होईतोवर देशात व राज्यात टिकून राहणार. ते केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.