Damu Naik Interview
पणजी: ‘आपण भंडारी समाजातील असलो, तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण सामान्य ते सर्वमान्य आहोत. केवळ एका समाजाचा विचार मी कधीच करत नाही. साऱ्यांना सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे’, अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. ‘जेथे चूक आहे, तेथे चूकच म्हणणार! कुणाचीही भलावण करण्याचा प्रयत्न करणार नाही’, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात सोमवारी रात्री प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी संपादक-संचालक राजू नायक यांनी दिलखुलास संवाद साधला. प्रश्नोत्तर स्वरूपात असलेल्या या कार्यक्रमात दामू नाईक यांनीही खुलेपणाने उत्तरे दिली. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेताना जी अलोट गर्दी उसळली होती, त्यामागील गमक सांगताना दामू नाईक म्हणाले, ‘हे यश भाजचे, सत्तेचे! हे यश एका सामान्य कार्यकर्त्याचे. यातून एक संदेशही दिला गेला तो म्हणजे पक्षावर निष्ठा ठेवल्यास योग्यवेळी योग्य फळ मिळते’.
राजकारणात मागील ३० वर्षांत अनेक आमदार झाले आणि गेले, तरीही तुम्ही खेळाडू म्हणून षटकार चौकार न मारता अजूनही खेळपट्टीवर टिकून राहिलात त्याविषयी ते म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष याशिवाय स्थानिक सर्व नेतृत्वांचे आभार मानतो. कारण त्यांनी आपल्याला संदेश दिले, सर्वांत महत्त्वाचा उल्लेख करावा तो मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, याशिवाय दत्ता खोलकर, संजीव देसाई आणि गोविंद पर्वतकर यांसह अनेकजणांनी मार्गदर्शन केले. एकप्रकारे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला तोही महत्त्वाचा.
मडकईकडे पुढील निवडणुकीसाठी कसे पाहता, असे विचारले असता दामू नाईक म्हणाले, केंद्रीय व स्थानिक नेतृत्व एकत्रित बसून निर्णय घेतील. ज्याठिकाणी कमी पडतो, तेथे संघटन वाढविणे हे आव्हान आहे. पक्षापासून जे दूर गेले आहेत, त्यांना एकत्रित आणावे लागणार आहे. भाजप हा एक परिवार आहे. मडकईच नाही, तर ४० ही मतदारसंघात आपण पक्षाचे संघटनात्मक कार्य वाढवू आणि संघटन हा पक्षाचा पाया आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
पक्षाची प्रेरणा आणि उच्च नेता म्हणून आपण केवळ मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाहतो. त्यांच्याकडे माणूस पारखण्याची ताकद होती. मडगावात नगरपालिकेसाठी नगरसेवकपदासाठी निवडणुकीपासून राजकारणातील प्रवासावर प्रकाश टाकताना दामू नाईक यांनी मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यामुळे राजकीय प्रवास सुरू झाला तो आत्तापर्यंत सुरू असल्याचे ते मान्य करतात.
काही लोक दुखावून गेले, काल लक्ष्मीकांत पार्सेकर, जीत आरोलकर भेटून गेले. पार्सेकर यांनी सांगितले की आपणास उमेदवारी मिळेल आणि आपण पक्षात येऊ, असे वृत्त आले आहे. त्यावर दामू म्हणाले, आपण वृत्त वाचले नाही.
आपणाकडे पार्सेकर हे काय बोलले ते आपणास आणि त्यांनाच माहीत. ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, पक्षाचा मूळ पाया रचण्यात त्यांचा वाटा आहे.
काहीवेळा एक निर्णय चुकीचा असू शकतो, वरखाली काही झाले असेल. कोणाच्या काही अटी वगैरे काही नाही. पक्षाच्या तत्त्वनिष्ठेनुसार पुढे जाणे आवश्यक आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आली असल्याने सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल. पक्षाला मागील पाच वर्षांपासून संघटन सचिव नाही, पण तरीही प्रमोद सावंत व सदानंद शेट तानावडे यांनी ‘कलेक्टिव्ह’ काम केले आहे.
मंत्र्यांना बदलावे किंवा त्यांना हटविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा. आपली जबाबदारी पक्ष संघटन मजबूत करण्याचे. कार्यकर्त्यांची भावना सर्वांसमोर योग्यरीत्या मांडणे. मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक महत्त्वाचे. मागे तिमाही परीक्षा झाली, आता सहामाही परीक्षा झाली आणि वार्षिक परीक्षेची वेळ आली, त्यावर मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष व आपण इतर सदस्य बसून चर्चा होईल.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत रणनीतीचा ‘मास्टर प्लॅन’ डोक्यात आहे, तो जाहीर करता येणार नाही. आत्तापर्यंत आयात झालेल्या आमदारांच्या म्हणजेच घोडेबाजाराला आळा घालण्याऐवजी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.