

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल सध्या ग्लॅमर आणि शहराच्या गजबजाटापासून दूर आपल्या मुलांचे संगोपन निसर्गाच्या सानिध्यात करत आहे. 'धुरंधर' फेम या अभिनेत्याने नुकतीच रणवीर अल्लाहबादियाच्या 'द रणवीर शो' या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्याने आपल्या मुलांना गोव्यात वाढवण्यामागचे रंजक कारण स्पष्ट केले. "शुद्ध हवा, मुक्तपणे धावणे, पोहणे आणि झाडांवर चढणे, जसा मी लहानाचा मोठा झालो, तसेच माझे मुलेही जगत आहेत. ती आतापासूनच सायकलिंग आणि ट्रेकिंग करत आहेत," अशा शब्दांत अर्जुनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अर्जुन रामपालच्या या भूमिकेवर 'एमपावर, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट'च्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (मानसशास्त्रज्ञ) अलिशिबा चार्ल्स अरसुद यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, निसर्गात वेळ घालवल्याने आणि मुक्त वातावरणात खेळल्याने मुलांमधील मानसिक ताण लक्षणीयरीत्या कमी होतो आणि त्यांचा मूड सुधारतो. शालेय अभ्यास, वेळेचे कडक वेळापत्रक आणि कामगिरीच्या दबावाततून निसर्ग मुलांना एक उत्तम विश्रांती देतो. यामुळे मुले कोणत्याही बंधनाशिवाय आनंदाचा अनुभव घेऊ शकतात.
आजच्या धावपळीच्या युगात पालकांना मुलांसाठी दर्जेदार वेळ काढणे कठीण जाते. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने कुटुंबाला एकत्र वेळ घालवण्याच्या नैसर्गिक संधी मिळतात. मग ते एखादी नवीन जागा शोधणे असो, नवीन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे असो किंवा आव्हानांचा एकत्र सामना करणे असो. मानसशास्त्रज्ञ अरसुद यांनी सांगितले की, "काम, शाळा आणि मोबाईल-टीव्हीच्या स्क्रीनपासून दूर राहिल्यामुळे कुटुंब एकमेकांशी भावनिकदृष्ट्या अधिक जोडले जाते. यामुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते."
अशा मोकळ्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वायत्तता विकसित होते. ती स्वतःच्या आवडीनिवडी शोधू शकतात आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शांत वातावरणात मुले आपले विचार पालकांसोबत सहज शेअर करतात. यामुळे कुटुंबातील संवाद सुधारतो आणि मुलांची मानसिक लवचिकता मजबूत होते.
तज्ज्ञांच्या मते, नवीन वातावरण मुलांच्या मेंदूला अशा प्रकारे चालना देते जे केवळ चार भिंतींच्या वर्गखोलीत शक्य नसते. ऐतिहासिक वास्तू, निसर्ग अभयारण्ये किंवा स्थानिक बाजारपेठांना भेट दिल्याने मुलांची निरीक्षण शक्ती वाढते. मुले प्रश्न विचारतात, गोष्टी जोडायला शिकतात आणि अधिक सर्जनशील बनतात. हे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता 'प्रायोगिक' बनते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा मुलांना अशा अनपेक्षित आणि नवीन वातावरणाचा अनुभव येतो, तेव्हा त्यांच्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण होते. हा गुण त्यांना आयुष्यातील अनिश्चिततेला तोंड देण्यास सक्षम बनवतो आणि त्यांच्यातील अस्वस्थता किंवा भीती कमी करून आत्मविश्वास वाढवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.