

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्ट्स नेहमीच व्हायरल होतात. अलीकडेच ‘रेडिट’वर एका युजरने उत्तर गोव्यातील हरमल बीच (अरंबोल) येथील १९८० आणि १९९० च्या दशकातील काही दुर्मिळ छायाचित्रे शेअर केली. या फोटोंमध्ये दिसणारा स्वच्छ, निर्मळ आणि शांत समुद्रकिनारा पाहून नेटकऱ्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
त्या काळातील हरमल बीचवरची कमी गर्दी, निळाशार समुद्र, पांढरीशुभ्र वाळू आणि साधेपणाने फिरणारे स्थानिक लोक असे दृश्य फोटोंमध्ये दिसते. कोणतीही मोठी हॉटेल्स, शॅक्सची रांग किंवा व्यापारी गोंधळ नसलेला किनारा पाहून अनेकांनी “हेच खरे गोव्याचे रूप होते” अशी भावना व्यक्त केली आहे.
काही स्थानिकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, “त्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी शांतपणे बसून सूर्यास्त पाहणे ही रोजची सवय होती,” असे लिहिले आहे. पर्यटकांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. “९० च्या दशकात हरमलला आलो होतो, तेव्हा इथली साधी राहणी आणि नैसर्गिक सौंदर्य मन जिंकून गेले होते,” अशी एक कमेंट विशेष लक्ष वेधून घेत आहे.
अनेकांनी सध्याच्या परिस्थितीशी तुलना करताना वाढती गर्दी, कचरा, व्यावसायीकरण आणि बदललेली जीवनशैली याबद्दल खंत व्यक्त केली. “गोवा पूर्वी किती भारी होता आणि आता तो तसा राहिला नाही,” असा सूर बहुतांश प्रतिक्रियांमध्ये जाणवतो. काहींनी प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली आहे.
या व्हायरल पोस्टमुळे जुन्या गोव्याच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हरमल बीचचे ते जुने फोटो केवळ छायाचित्रे नसून, एका काळातील साधेपणा, शांतता आणि नैसर्गिक समृद्धीची साक्ष देणारे दस्तऐवज ठरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.