

चंदीगड: पंजाबमधील गुरदासपूर येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असतानाच, आता या प्रकरणाला गँगवॉरचे नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येचा निषेध केला असून, हल्लेखोरांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना शिरच्छेद करण्याची उघड धमकी दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरी बॉक्सर, आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. "देशाच्या दोन प्रामाणिक अधिकाऱ्यांची (गुरनाम सिंह आणि अशोक कुमार) हत्या करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. तुम्ही भारतमातेच्या दोन पुत्रांना शहीद केले आहे, त्याचा बदला आम्ही रक्ताने घेऊ. तुम्ही आमचे दोन माणसे मारले, आम्ही तुमचे १० मारू," असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या टोळीने केवळ हल्लेखोरांनाच नव्हे, तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर गुन्हेगारांनाही लक्ष्य केले आहे. "जे स्वतःला गँगस्टर समजतात आणि या दहशतवाद्यांची साथ देतात, त्यांनी आता तयार राहावे. तुमचा गळा कापून आम्ही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू, तेव्हा देशाला तुमचे सत्य कळेल. तुम्ही कुठेही लपलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. जर कोणी देशाच्या सैनिकांवर किंवा प्रशासनावर डोळा उचलून पाहिला, तर आम्ही डोळे काढून घेऊ," असा भयानक इशारा बिश्नोई टोळीने दिला आहे.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आदियां (गुरदासपूर) गावातील एका चेकपोस्टवर रविवारी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. एएसआय (ASI) गुरनाम सिंह आणि होमगार्ड अशोक कुमार हे कर्तव्यावर असताना त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. ही हत्या ते झोपेत असताना करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास चक्रे वेगाने फिरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.