
डिचोली: आठवडाभर ‘अवकाळी’ पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असतानाच, दुसऱ्या बाजूने आमठाणे जलाशयासाठी हा अवकाळी पाऊस उपयुक्त ठरला आहे. गेल्या सलग पाच-सहा दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे आमठाणे धरणातील जलसाठ्याची पातळी वाढली असून, या जलाशयातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी साळ बंधाऱ्यातून सोडण्यात येणारा पाणी पुरवठा आता बंद करण्यात आला आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे आमठाणे जलाशयातील जलसाठ्याची पातळी साधारण एक ते सव्वा मीटर इतकी वाढल्याचा अंदाज आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनीही या अंदाजास पुष्टी दिली आहे.
आज (रविवारी) सायंकाळपर्यंत आमठाणे जलाशयातील जलसाठ्याची पातळी ४६ मीटर एवढी झाली होती. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जलाशयातील जलसाठा ४४ मीटर एवढा झाला होता.
आमठाणे जलाशयातील मुख्य गेटीची दुरुस्ती केल्यानंतर महिन्यापूर्वी या जलाशयात अधूनमधून साळ बंधाऱ्यातून पाणी सोडून जलाशयातील जलसाठा नियंत्रित करण्यात येत होता. मात्र आता पाच-सहा दिवस पडलेल्या जोराच्या पावसामुळे साळ बंधाऱ्यातील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. मोसमी पाऊस वेळेवर आणि समाधानकारक पडला, तर पुढील वर्षी साधारण एप्रिल महिन्यापर्यंत तरी काळजी करण्याचे कारण नाही. असा जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.