वाहतूक संचालकांच्या बडतर्फच्या मागणीसोबत काँग्रेसने 'या' कारणास्तव सरकारला दिलाय 15 दिवसांचा अल्टिमेटम..

Goa Congress: ब्लॅक स्पॉट्स, अपघात प्रवण क्षेत्रे सुधारण्यासाठी आणि रहदारीचे नियमन करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम..
Accident
AccidentDainik Gomantak

Goa Congress: काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल (आयएएस) यांना पत्र लिहून वाहतूक संचालक पोलुमतला पी. अभिषेक यांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्तीबद्दल तसेच राज्यातील रस्त्यांवरील जीवघेण्या अपघातांवर उपाययोजना करण्यात आलेल्या पूर्ण अपयशाबद्दल त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी राज्यातील ब्लॅक स्पॉट्स आणि अपघात प्रवण क्षेत्रे सुधारण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. काँग्रेस पक्षाने गोव्यातील वाहतुकीचे प्रभावी वाहतूक व्यवस्थापन करून नियमन करण्याची मागणीही सदर पत्रातून केली आहे.

गोव्यातील किलर रोडवरील वाढत्या जीवघेण्या अपघातांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन करण्यात सरकारला आलेले अपयश याविषयी काँग्रेस पक्षाने सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी वाहतूक संचालनालयात जावून निदर्शने केली होती.

यावेळी राज्यात 48 तासांत पाच मृत्यू होऊनही वाहतूक संचालक रजेवर असल्याचे लोकांच्या समोर आले होते.

सध्याचे वाहतूक संचालक अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि उद्दाम असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले आहे.

त्यांच्या नाकर्तेपणामूळेच गोव्यातील भयानक रस्त्यांवर निरपराधांना जीव गमवावा लागला आहे. या परिस्थितीत त्यांना वाहतूक संचालक पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे अमित पाटकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

गोव्यातील ब्लॅक स्पॉट्स आणि अपघात प्रवण क्षेत्रे दुरुस्त करण्यासाठी वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणताही पाठपुरावा केला नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

गोव्यातील ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक विभागाचे अजिबात नियंत्रण नाही हे धक्कादायक आहे, असे अमित पाटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

मुख्य सचिवांना सादर केलेल्या पत्रात अमित पाटकर यांनी गोव्यातील “रेंट-ए-कॅब आणि रेंट-ए-बाईक” ऑपरेटर्सचे नियमन करण्यात वाहतूक विभाग पूर्णपणे अयशस्वी ठरला असल्यानेच पर्यटकांनी स्वतः चालविण्यासाठी भाड्याने घेतलेली वाहने विविध प्राणघातक अपघातांमध्ये लोकांचे जीव घेण्यास कारणीभूत ठरली असल्याचे निदर्शनास आणले आहे.

स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या हजारो दुचाकींबाबत वाहतूक विभागाकडे कोणतीच नोंद नसल्याने सरकारचा महसूल बुडत आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

गोव्यातील 29 कंपन्यांकडून 230.35 कोटी रुपयांचा ग्रामीण कल्याण उपकर वसूल करण्यात वाहतूक विभागाला अपयश आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कदंब बसेस आणि बालरथांचे सुरक्षा ऑडिट सरकारने केले नाही, असे पत्रात नमूद केले आहे.

गेल्या 40 दिवसांत गोव्यातील भयानक रस्त्यांवर झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये जवळपास 40 जणांना जीव गमवावा लागल्याचे दिसून आले आहे.

2022-23 मध्ये गोव्यात रस्ते अपघातात 335 जणांना जीव गमवावा लागला. अपघातांचे हे चिंताजनक प्रमाण असतानाही वाहतूक विभागाने अपघात प्रवण क्षेत्र सुधारण्यासाठी तसेच वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. वाहतूक कायदा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासही सरकार अपयशी ठरल्याचे अमित पाटकरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com