

डिचोली: अक्षत नाईक या युवकाच्या मृत्यूप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. अक्षतच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी मृत अक्षत याच्या वडिलांसह कुटुंबीयांनी केली आहे. तशी लेखी तक्रार मृत अक्षत याचे वडील राजेश नाईक यांनी सोमवारी (ता.२९) सायंकाळी डिचोली पोलिसांत केली आहे.
ज्यांनी अक्षत याला काम करण्यासाठी नेले होते, त्यांच्यासह घरमालकाने निष्काळजीपणा केल्यानेच माझ्या मुलाचा जीव गेला. तसेच मृत्यूप्रकरणी घटना स्थळावरील पुरावे नष्ट करून संशयास्पद गोष्टी जाणूनबुजून लपविल्या आहेत, असा दावा वडील राजेश नाईक यांनी केला आहे.
दरम्यान, म्हावळींगे येथील ज्या घरात अक्षत याला विजेचा ‘शॉक’ लागून मृत्यू आला, त्या घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सोमवारी (ता.२९) पंचनामा केला. यावेळी वीज खात्याचे अभियंतेही उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे.