
पणजी: ‘माझा बायोडेटा जेव्हा मी इतरांना देतो तेव्हा त्यात खरे तर दोनच ओळी असतात- मी मूळ गोव्याचा आहे, ही त्यातील पहिली ओळ असते तर माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकी आहेत, ही त्यातील दुसरी ओळ असते. या दोन्ही गोष्टींबद्दल मला खूपच अभिमान आहे. गोवा सरकारचा गोमंत विभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मला लाभला, याचा मला अभिमान आहे’, अशा शब्दांत पं. अजित कडकडे यांनी भावना व्यक्त केल्या.
‘मी गोव्यात जन्मलो आणि वाढलो ही माझ्यासाठी प्रचंड अप्रुपाची बाब आहे. अर्थात नंतर महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी बनली. जेव्हा जेव्हा मी गोव्यात येतो, माझे विमान जेव्हा गोव्याच्या भूमीत लँड होते आणि विमानाचा दरवाजा उघडल्यानंतर गोव्याच्या वाऱ्याची जी पहिली झुळूक अंगावर येते ती वेगळीच असते. प्रत्येक वेळी गोव्यात येणे इतके छान असते!
मात्र, अलीकडच्या काळात गोवा आपला आहे की बाहेरच्यांचा आहे, याची शंका येत राहते. माझ्या लहानपणीचा जो गोवा होता, ज्यात गोवेकर एकत्र सोफ्यावर आरामात बसले आहेत आणि त्यांच्या छान गप्पा चालू आहेत हे दृश्य मात्र आज विरळ झाले आहे. आताचा गोवा वेगवान झाला आहे. या गोव्यात गोवेकर कमी दिसतात आणि बाहेरची माणसे फार दिसतात, असे कडकडे म्हणाले.
गाण्यात मी केलेल्या प्रयोगांबद्दल सांगायचे झाल्यास, अशा प्रकारचे प्रयोग कधी सफल होतात तर कधी होत नाहीत. प्रयोग जेव्हा असफल होतात तेव्हा त्यामागे काही कारणे निश्चित असतात. ती कारणे त्यावेळी आपल्या लक्षात कदाचित आलेली नसतात किंवा त्यांचा अभ्यास आम्ही केलेला नसतो त्यामुळे प्रयोगांना सफलता लाभलेली नसते असे मला नेहमी वाटते. मात्र जर कलेत नावीन्यता उत्पन्न व्हायची असेल तर त्यात प्रयोग हे झालेच पाहिजेत. ''कशाला हवेत अशा प्रकारचे प्रयोग? जे आहे ते गा ना!'' अशा प्रतिक्रिया अनेक वेळा व्यक्त होतात. अर्थात आहे ते फारच सुंदर आहे तरीसुद्धा प्रयोग करून पाहायला हरकत नसली पाहिजे, असे कडकडे म्हणाले.
माझ्या या कला प्रवासात चढउतार तर खूपच आले. अर्थात कुठल्याच कलाकाराचा जीवनप्रवास आरामात कधीच घडत नाही. तो बहुधा खडतरच असतो. कधीकधी छानपणे चालतो तर कधी समोर खड्डा येतो. पण माझ्या बाबतीत सांगायचे झाल्यास माझे गुरू पंडित अभिषेकी यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, या भावनेने गेली ५० वर्षे मी गात आलो आहे. कुठेही काहीही कमी पडले नाही. ज्या
संतश्रेष्ठांना मानतो त्यांची कृपा जेव्हा आपल्यावर असते तेव्हा रोज बासुंदी खायला मिळाली नाही तरी पिठले-भाताला कुठेही कमी पडत नसते. प्रवासात अडचणी जरी आल्या तरी त्याला आपण नेहमी हसत खेळत सामोरे गेले पाहिजे. अनेक श्रेष्ठ कलाकारांना या चढउतारांना सामोरे जावे लागलेच आहे. पण, अशा अडचणींचा बाऊ न केल्याने ते पुढे गेले आणि मोठे कलाकार बनले, असे कडकडे म्हणाले.
गेली पाच दशकाहून अधिक काळापासून आपल्या जादुई आवाजाने जगभर मोहिनी घालणारे डिचोलीचे सुपुत्र तथा प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजित कडकडे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'गोमंत विभूषण' पुरस्कार जाहीर झाल्याने डिचोलीत उत्साह पसरला आहे. हा गौरवास्पद क्षण असल्याचे मत डिचोली कोकणी सेवा केंद्राने व्यक्त केले आहे. ११ जानेवारी १९५१ रोजी आतीलपेठ-डिचोली येथील कडकडे कुटुंबात जन्मलेले अजित कडकडे यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले हे त्यांचे गुरुवर्य असून शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यगीत आदी क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला आहे. गोवा-महाराष्ट्रासह देश-विदेशात त्यांनी आपली कला सादर केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.