
पणजी: गोवा सरकारला हमी देऊनही एअर इंडियाने लंडन गॅटविक–गोवा ही थेट विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५–२६ च्या हिवाळी हंगामात एअर इंडिया अमृतसर आणि अहमदाबाद येथे थेट विमानसेवा सुरू करेल असे स्पष्ट करतानाच गोव्यासाठीची सेवा बंद करण्यात आल्याचे आणि २६ ऑक्टोबरपासूनची बुकिंग थांबवल्याचे जाहीर केले.
त्यामुळे लंडन ते गोवा असा थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, याचा परिणाम राज्याच्या पर्यटनावरही होण्याची शक्यता आहे. अनेक गोमंतकीय व्यवसाय, नोकरीच्या माध्यमातून लंडनमध्ये स्थायिक झालेले आहेत. काही उद्योजकांची उद्योगाच्या निमित्ताने लंडनमध्ये ये–जा सुरू असते. अशांना लंडन गॅटविक ते गोवा अशा थेट विमानसेवेचा फायदा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही हा विषय केंद्र सरकारसमोर उपस्थित करीत, अशी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केंद्रीय विमानोड्डाण मंत्र्यांकडे केली होती. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनात हा विषय उपस्थित केला होता.
त्यानंतर त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांना पत्र पाठवून गोवा आणि लंडन-गॅटविक दरम्यान एअर इंडियाची सेवा सुरू करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री किेंजरापु यांनीही यात हस्तक्षेप करून ही सेवा सुरू करण्याची हमी दिलेली होती. परंतु, आता एअर इंडियाकडून ही सेवा रद्द करीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विमान कंपन्या गोव्याला आपल्या व्यवसाय यादीतून बाहेर ठेवत आहेत आणि इतर राज्यांना त्या प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या पर्यटनावर होत आहे. एयर इंडियाने २०२५-२६ च्या हिवाळी हंगामात लंडन गॅटविक नेटवर्कमधून गोव्याला वगळल्याच्या विषयातून हेच समोर आले आहे.
गोव्याला स्पर्धात्मक आणि पर्यटनासाठी आकर्षक बनविण्यासाठी राज्य सरकारने आपल्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे.
राज्यातील दाबोळी व मोपा विमानतळ पर्यटनाला चालना देईल, असा दावा सरकारने केला होता. पण सध्या अर्थव्यवस्था अडचणीत आहे. कारण एअरलाईन्स कंपन्या त्यांच्या नेटवर्क सूचीमधून गोव्याला बाजूला करीत असून, इतर राज्यांना प्राधान्य देत आहेत. तसेच सरकार ''दाबोळी विमानतळ'' ’घोस्ट’ विमानतळात रूपांतरित करण्याच्या प्रयत्नात आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे पर्यटनाचे चित्रही धूसर आणि अनिश्चित दिसत आहे. सरकारला त्यांच्या धोरणांमध्ये आणि राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये अपयश आले आहे. सरकार फक्त कर्ज घेण्यावर लक्ष केंद्रित करत असून, उत्पन्न निर्माण करण्यावर नाही.
पर्यटन खाते विदेशातील पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी तेथील दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु या प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम होताना दिसत नाहीत.
पर्यटन पुनर्जीवीत करण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होईल. शिवाय याचा लंडनमधील गोमंतकीय समुदायावरही परिणाम होऊन त्यांना गोव्यात येणे कठीण होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.