Goa News : पाणीटंचाईनंतर आता विजेचा लपंडाव; नागरिक 'बेजार'

कंडक्टर्स, इन्सुलेटर्स खराब असल्याचा खात्याचा दावा
Electricity Issue
Electricity IssueGomantak Digital Team

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई बरोबर आता विजेचा लपंडाव सुरू झाल्याने लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पाऊस लांबल्याने वाढलेली आर्द्रता, उष्णता आणि त्यात विजेचा लपंडाव यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी विविध वीज कार्यालयांकडे धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे.

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला मानवी चूक वा खाते जबाबदार नसून सदोष जुने कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सच कारणीभूत असल्याचे वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मॉन्सून पाऊस लांबल्याने राज्यात अनेक ठिकाणच्या धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पंचवाडी, अंजुणे धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे या धरणांवर असलेले जलप्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत.

त्यामुळे विविध प्रकल्पांमधून लोकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांचा सरकार वरचा रोष वाढला आहे. पावसाळ्यात पाऊसही हुलकावणी देत असून विजेचाही लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांचा पारा वाढला आहे.

Electricity Issue
Goa Government : शेतजमिनी रिअल इस्टेट लॉबीच्या घशात घालण्याचा डाव, सुधारित कायद्याबाबत नेत्याला शंका

टॅंकरने पाणीपुरवठा पण तोही अपुरा

अंजुणे धरणावरील पडोसे जलप्रकल्प बंद आहे. आता या प्रकल्पासाठी इतर ठिकाणाहून पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे डिचोली, वाळपई साखळी परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय बार्देश आणि पेडणे तालुक्यातही पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असला, तरी तो अत्यंत अपुरा आणि अनियमित आहे.

सदोष कंडक्टर्सच वीज समस्येला कारण !

दक्षिण गोव्यामध्ये सध्या वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. या समस्येबद्दल वीज खात्यालाच जबाबदार धरून कर्मचाऱ्यांना जाब विचारला जातो. मात्र, सदोष इन्सुलेटर्स आणि कंडक्टर्सच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याला प्रमुख कारण आहे.

शिवाय दक्षिण गोव्यात आंबेवाडी (कर्नाटक) मधून वीज पुरवठा होतो. त्यामुळे वीज उपकरणांची देखभाल करताना वीज खात्याला बरेच त्रास सोसावे लागतात, असा दावा मुख्य वीज अभियंते स्टिफन फर्नांडिस यांनी केला आहे. वीज खात्याच्या पाहणीत सदोष इन्सुलेटर्स हेच प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

Electricity Issue
गोव्यात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती; हवामान खात्याने सांगितले 'या' दिवसापासून पावसाचा जोर वाढणार

सासष्टी भागात 15 दिवसांत सुरळीत वीज

कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या वीज वाहिन्या दाट जंगलातून येतात, त्यामुळे अधून मधून वाहिन्यांवर झाड जास्त करून बांबूचे कोसळले तर मग ती जागा शोधून काढणेही कधी कधी कठीण होऊन बसते.

जवळ जवळ ४० टक्के वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. सासष्टी भागातील वेळ्ळी, करमोणा, बाणावली व खास करून इतर समुद्र किनारी भागामध्ये वीज पुरवठ्यातील लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.जंपर्स व वीज खांब तसेच ६० टक्के जुने कंडक्टर्स बदलण्याचे काम पूर्ण केले जाईल. १५ दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

"खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येवर केवळ भूमिगत वीज वाहिन्या हाच उत्तम उपाय आहे. त्यामुळे इन्सुलेटर्स व कंटक्टर्सचा त्रास जाणवणार नाही. शिवाय या उपकरणांसाठी राज्याला इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागते."

"कित्येक दशकांपासुन इन्सुलेटर्स व कंडक्टर्स बदललेलेच नाहीत. बहुतांश उच्च दाबाच्या वीज वाहिन्यावरील ही उपकरणे बदललेली नाहीत. पुढील दोन वर्षांत भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण केले जाईल व त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल."

-सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com