

वाळपई: गावाच्या संस्कृतीचे, पर्यावरणाचे आणि पारंपरिक अस्तित्वाचे संरक्षण करण्यासाठी सत्तरी तालुक्यातील भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवईतील ग्रामस्थांनी गावातील एक इंचही जमीन परप्रांतीयांना विकणार नसल्याचा निर्धार केला.
ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवी मंदिरात आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा ठराव एकमुखाने मंजूर केला. दुसरीकडे, कारापूर, नावेलीत मेगा प्रकल्पांना विरोध दर्शवत ग्रामस्थांनी प्रकल्पांना ‘चले जाव’चा नारा दिला. अडवईतील ग्रामस्थांनी सांगितले की, अलीकडच्या काळात राज्यातील तसेच राज्याबाहेरील व्यक्ती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करत आहेत.
त्यामुळे गावांची मूळ ओळख, संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात गावातील कोणत्याही व्यक्तीने बाहेरील व्यक्तींना जमीन विकू नये, असा सामूहिक निर्णय घेण्यात आला.
गरज पडल्यास जमीन गावातीलच पात्र कुटुंबीयांना किंवा ग्रामस्थांनाच विकावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत बाहेरील व्यक्तींना भूखंड अथवा जमीन विकली जाणार नाही, असेही ठरावात नमूद करण्यात आले.
कारापूर सरपंच व संतप्त महिलेमध्ये शाब्दिक चकमक
वादग्रस्त मेगा गृहनिर्माण प्रकल्पावरून कारापूर-सर्वण सरपंच आणि एका महिला पंचसदस्यामध्ये शाब्दिक वाद होऊन हमरीतुमरी झाली. सरपंच अनवी (बिंदिया) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली.
ग्रामसभेस उपसरपंच बीबी आयेशा मागोड यांच्यासह दिव्या नाईक, तन्वी सावंत, उज्ज्वला कवळेकर, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर आणि दामोदर गुरव उपस्थित होते. तर दत्तप्रसाद खारखांडे, सुकांती खारखांडे आणि ज्ञानेश्वर बाले अनुपस्थित होते.
मेगा प्रकल्पावरून सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकल्पावरून मेगा प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या पंचसदस्य उज्ज्वला कवळेकर यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताच वातावरण काहीसे तापले होते.
पोलिस छावणीचे स्वरूप
कारापूर-सर्वण ग्रामसभेला ग्रामस्थांची प्रचंड गर्दी उसळली होती. काही ग्रामस्थांना सभागृहाबाहेर राहावे लागले. पाचशेहून अधिक ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रचंड सशस्त्र पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कारापूर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी आणि पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. वाद आणि गदारोळ सोडल्यास ग्रामसभा नियंत्रणात पार पडली.
लोकांची एकजूट
कुडतरी ग्रामसभेत मेगा गृहप्रकल्पांना विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच ३९-ए कलमालाही विरोध करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार पंचायत प्रशासनाने भूमिका घ्यावी, अशी सूचना करण्यात आली. ग्रामसभेत गावातील सर्व प्रस्तावित मेगा गृहप्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
कुडतरीतील सुमारे ६७ हजार चौरस मीटर जागेचा रोजगारनिर्मितीसाठी उपयोग व्हावा, अशी मागणी करत औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या आलेक्स रेजिनाल्ड यांनी गावात रोजगाराभिमुख प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले, गेली २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गावाच्या हितालाच प्राधान्य दिल्याचे सांगितले. आपण कधीही मेगा गृहप्रकल्पांना मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट करत, निवडणूक वर्ष जवळ आल्याने काही विरोधक राजकीय हेतूने आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.