

पणजी: वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वी बजावलेल्या मंत्रिपदाच्या काळात गोमंतकियांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत, याची आठवण करून देत ढवळीकर यांचे वयोमान झाल्याने कदाचित त्यांना आदल्या दिवशी स्वतः काय बोललो, याची आठवण राहत नसावी, अशी टीका ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केली.
दरम्यान, गोव्यात डिजिटल मीटर असताना स्मार्ट मीटर बसवण्याची काय गरज आहे, असा सवालही त्यांनी केला. पक्षाच्या येथील मुख्य कार्यालयात सुरेल तिळवे आणि वाल्मिकी नाईक या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ढवळीकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तिळवे म्हणाले, सुदिन ढवळीकर हे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, त्यांनी राज्यातील जनतेला २४ तास पाणी देणार असल्याचे स्वप्न दाखविले.
शिवाय फोंड्यात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्याविषयी काय केले, त्याचबरोबर कोट्यवधी रुपये खर्चून फोंड्यात आरटीओचा वाहन चाचणी प्रकल्प कुठे गेला, याची आठवण त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, पत्रकारांना माहिती देताना ती व्यवस्थित द्यायला हवी होती, परंतु बोलल्यानंतर आपण तसे बोललोच नाही, असे सांगणे म्हणजे त्यांना वयोमानाने विसर पडतो, असे दिसते.
नाईक म्हणाले, राज्यातील स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत, स्मार्ट मीटरची संख्या साडेसात लाख आहे. स्मार्ट मीटरची निविदा प्रक्रिया ज्यांनी दुप्पट रक्कम निविदेत लिहिली आहे, त्या कंपनीला ती निविदा दिली आहे. यावरून सरकारचे धोरण स्पष्ट होते. डिजिटल मीटर राज्यात सुस्थितीत आहेत, असे असतानाही स्मार्ट मीटरचा घाट का घातला जात आहे. ‘आप’चा या स्मार्ट मीटरला विरोध आहे. स्मार्ट मीटरमुळे काही शेकड्यात येणारी बिले आता हजारो रुपयांत येणार आहेत. सध्या बिलांत जी सवलत मिळते आहे, तशी सवलत अजिबात मिळणार नाही,असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.