Goa Board : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 'या' निर्णयामुळे 9 वी, 11 वी नापास विद्यार्थ्यांना मिळणार सुसंधी

भगीरथ शेट्ये : विद्यार्थ्यांना देता येणार 10वी, 12वीची परीक्षा, पुरवणी परीक्षेचाही पर्याय
Student
Student Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Board of Secondary and Higher Secondary Education नववी आणि अकरावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि अकरावीच्या परीक्षा खासगी विद्यार्थी म्हणून देता येतील, अशी माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

शेट्ये म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही मुलाला आठवीपर्यंत नापास करता येत नाही. यासह अन्य कारणांमुळे नववीतील काही मुलांचा शैक्षणिक दर्जा तितकासा योग्य नसतो. यामुळे आपल्या शाळांचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शाळांमध्ये नववीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नापास केले जाते.

यामुळे नववीमधील शाळा सोडण्याचे (ड्रॉप आउट) प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. यासाठी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अशा मुलांबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे.

अशा विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी विशेष मार्गदर्शन द्यावे आणि त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता त्यांना खासगी विद्यार्थी म्हणून शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसवता येईल.

अशा मुलांना मार्गदर्शन केल्याचा अतिरिक्त मोबदला संबंधित शिक्षकांना शिक्षण मंडळाकडून देण्यात येईल. असेही ते म्हणाले.

Student
Ponda-Sanquelim Municipal Election 2023: आता जोर गाठीभेटी आणि गुप्त बैठकांवर

11 वीच्या कला-वाणिज्यसाठीही पर्याय

हीच बाब अकरावीतील विद्यार्थ्यांबाबत समोर आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये बारावीची परीक्षा देण्यायोग्य गुणवत्ता नसल्यास त्यांना अकरावीमध्येच नापास करण्यात येते. मात्र, अशा विद्यार्थ्यांनाही यापुढे बारावीची परीक्षा देता येईल.

मात्र, हा पर्याय केवळ कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा देणे अनिवार्य असल्याचे शेट्ये म्हणाले.

तब्बल २ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी नापास

राज्यात प्रत्येकवर्षी सुमारे २१ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. मात्र, नववीतील विद्यार्थ्यांची संख्या २३ ते २४ हजार असते. त्यामुळे नवीन नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

यापैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी शाळा सोडण्याऐवजी जर पुढील वर्षासाठी पात्र ठरले तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पुरवणी परीक्षेचा पर्याय

९ वी आणि ११ वीतील विद्यार्थी नापास झाल्यास अशा विद्यार्थ्यांना महिनाभराच्या अंतराने लगेच पुरवणी परीक्षा देण्याचा पर्याय काही शाळांनी सुरू केला आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या नियमित अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.

हीच बाब अकरावीतील विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे. शिवाय दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असल्याचे शेट्ये म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com