

Jharkhand Win Against Haryana: पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात झारखंडने इतिहास रचला. कर्णधार ईशान किशनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर झारखंडने हरियाणाचा 69 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या टी-20 स्पर्धेवर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हरियाणाचा संघ अंतिम सामन्यात मात्र झारखंडच्या अष्टपैलू खेळापुढे पूर्णपणे हतबल दिसला.
नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या झारखंडच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीला आलेल्या कर्णधार ईशान किशनने हरियाणाच्या गोलंदाजांचा अक्षरश: समाचार घेतला. ईशानने अवघ्या 49 चेंडूंमध्ये 101 धावांची धमाकेदार खेळी खेळली, ज्यामध्ये 10 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. ईशानला कुमार कुशाग्रने साथ दिली. कुशाग्रने केवळ 38 चेंडूंत 81 धावा कुटल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळे झारखंडने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 262 धावांचा डोंगर उभा केला. डावाच्या अखेरीस अनुकूल रॉय (40*) आणि रॉबिन मिंज (31*) यांनी वेगाने धावा जमवत धावसंख्या 250 च्या पार नेली.
263 धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेला हरियाणाचा कर्णधार अंकित कुमार डावाच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पाठोपाठ आशिष सिवाचदेखील शून्यावर बाद झाल्याने हरियाणाची अवस्था 2 बाद 2 अशी झाली. या धक्क्यातून हरियाणाचा संघ सावरु शकला नाही. पॉवरप्लेच्या 6 षटकांत हरियाणाने 58 धावा केल्या खऱ्या, पण त्यांचे 3 महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले होते.
निशांत सिंधू आणि यशवर्धन दलाल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करुन डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. सिंधू 31 धावा करुन बाद झाल्यानंतर हरियाणाची मधली फळी पत्त्यासारखी कोसळली. झारखंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत हरियाणाला 18.2 षटकांत 193 धावांत रोखले. हरियाणाकडून यशवर्धन दलालने एकाकी झुंज दिली, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही मोठी साथ मिळाली नाही.
फलंदाजीनंतर झारखंडच्या गोलंदाजांनीही आपले वर्चस्व गाजवले. वेगवान गोलंदाज सुशांत मिश्रा आणि बाल कृष्णा यांनी प्रत्येकी 3 बळी घेत हरियाणाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यांना फिरकीपटू अनुकूल रॉय आणि विकास सिंह यांनी प्रत्येकी 2 बळी घेत उत्तम साथ दिली. या विजयासह झारखंडचा संघ पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅटचा राष्ट्रीय चॅम्पियन बनला आहे. ईशान किशनने आपल्या नेतृत्वाखाली झारखंडला हे पहिलेवहिले विजेतेपद मिळवून दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.