
पणजी: भारताचा कसोटी सलामीवीर डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने यू-टर्न घेताना गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे न खेळता मुंबई क्रिकेट असोसिएशनशी बांधिलकी कायम राखली, त्यानंतर साडेतीन महिने उलटले, पण गोव्याच्या रणजी संघासाठी अनुभवी पाहुणा क्रिकेटपटू गवसलेला नाही.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पाहुणा या नात्याने गोव्यातर्फे सलग चौथा मोसम खेळण्यासाठी सज्ज होत आहे. आगामी २०२५-२६ मोसमासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) कर्नाटकचा सफल वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक याला करारबद्ध केले आहे. फलंदाजीत आधारस्तंभ ठरेल असा भक्कम फलंदाज अजून सापडलेला नाही.
प्रत्येक क्रिकेट संघटना मोसमासाठी तिघा पाहुण्या क्रिकेटपटूंना करारबद्ध करू शकते. नव्या मोसमासाठी अगोदरच्या संघटनेकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) सादर करावा लागतो. नव्या संघटनेशी नोंदणी करण्यासाठी क्रिकेटपटूंना ऑगस्टअखेरपर्यंत मुदत असते. महिना संपण्यास काही दिवस बाकी असून तिसऱ्या क्रिकेटपटूसाठी जीसीएची सध्या शोधामोहीम कायम आहे.
जीसीएतील विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी भारताकडून आपला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना खेळलेला दक्षिणेकडून भक्कम तंत्र असलेला फलंदाज गोव्याकडून खेळण्यास तयार होता, परंतु काही कारणास्तव करार प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
या फलंदाजाच्या काही अव्यवहारिक मागण्या जीसीएला मान्य नाहीत, त्यामुळे हा फलंदाज गोव्याकडून खेळण्याची शक्यता आता खूपच अंधूक आहे. ठरलेल्या मुदतीत तिसरा पाहुणा क्रिकेटपटू करारबद्ध न केल्यास गोव्याला आगामी रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अर्जुन व कौशिक या दोघाच पाहुण्या गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल.
हल्लीच साखरपुडा झालेला डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर २०२२-२३ पासून गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मात्र नव्या मोसमात गोव्यातर्फे खेळताना त्याची तंदुरुस्ती निर्णायक ठरू शकते, अशी माहिती सूत्राने दिली. गतमोसमात दुखापतींचा फटका बसल्यामुळे तो सर्व सामने खेळू शकला नव्हता. रणजी स्पर्धेतील चार सामन्यांव्यतिरिक्त तो प्रत्येकी तीन टी-२० व एकदिवसीय सामने खेळला होता. रणजी स्पर्धेत त्याने १६ गडी बाद केले होते, मात्र फलंदाजीत त्याला ५१ धावाच करता आल्या होत्या.
गतमोसमात प्लेट करंडक जिंकून एलिट गटात दाखल झालेल्या गोव्यासमोर २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खूपच खडतर आव्हान आहे. एलिट ब गटात गोव्याचा संघ सात सामने खेळणार आहे, त्यापैकी तीन सामने घरच्या मैदानावर होतील. स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून मोहीम १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिला सामना गोव्यात चंडीगडविरुद्ध होईल.
त्यानंतर कर्नाटक (२५ ऑक्टोबरपासून) व पंजाबविरुद्ध (१ नोव्हेंबरपासून) अवे मैदानावर खेळल्यानंतर गोव्याचा संघ ८ नोव्हेंबरपासून मध्य प्रदेशविरुद्ध घरच्या मैदानावर खेळेल. नंतर १६ नोव्हेंबरपासून सौराष्ट्रविरुद्ध अवे मैदानावर लढत होईल. दुसऱ्या टप्प्यात २२ जानेवारीपासून महाराष्ट्राविरुद्धचा सामना अवे मैदानावर खेळल्यानंतर अखेरचा साखळी सामना गतउपविजेत्या केरळविरुद्ध २९ जानेवारीपासून गोव्यात होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.