
England Defeats India in Third Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. विजयासाठी 193 धावांचे आव्हान भारतीय संघाला गाठता आले नाही आणि दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या डावात 387 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रुटने शानदार 104 धावांची शतकी खेळी, तर जैमी स्मिथने 51 आणि ब्रायडन कार्सने 56 धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरात, भारतीय संघानेही पहिल्या डावात 387 धावा करुन इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरी साधली होती. भारताकडून केएल राहुलने शतक (100+), तर ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.
इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना फारशी चमकदार कामगिरी केली नाही. त्यांचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले. या डावातही जो रुटने सर्वाधिक 40 धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने 33 आणि हॅरी ब्रूकने 23 धावांचे योगदान दिले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 बळी घेतले. इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपुष्टात आला, त्यामुळे भारतासमोर 193 धावांचे आव्हान होते.
भारतीय संघाने या कसोटी मालिकेत आतापर्यंत दाखवलेली फलंदाजी पाहता, 193 धावांचे लक्ष्य सहज गाठले जाईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात असलेला दबाव वेगळ्याच पातळीवर असतो आणि याचेच दर्शन भारतीय फलंदाजीदरम्यान घडले. चौथ्या डावात भारतीय फलंदाजांना म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही. यामध्ये यशस्वी जयस्वाल असो, शुभमन गिल असो किंवा करुण नायर, कुणीही क्रीजवर टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही.
तर टॉप ऑर्डरमध्ये केएल राहुलने आणि लोअर ऑर्डरमध्ये रवींद्र जडेजाने काही प्रमाणात संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. अखेरीस भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात आर्चरने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. या डावात रवींद्र जडेजा भारताच्या फलंदाजीत एकमेव हिरो ठरला, तो 181 चेंडूत 61 धावा काढून नाबाद राहिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.