Bicholim: सुशेगाद म्हणजे 'आळशी' नाही, तर 'समाधानी'; डिचोलीतील गावांची कृषी पोसणारा 'ओहळ'

Bicholim Stream: आपल्या पूर्वजांनी नाहक खर्च करून रासायनिक खताच्या वापराने शेत जमीन, बागायती खराब करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला नव्हता.
Water Stream
Water StreamDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

आपल्या पूर्वजांनी नाहक खर्च करून रासायनिक खताच्या वापराने शेत जमीन, बागायती खराब करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांनी बैलाच्या साहाय्याने नांगरणी करून, कुदळीने खणून, चिखलात हात घालून काम केले. तिचा कस राखण्यासाठी झाडांची पाने, शेणखत, राख वापरून शेतजमिनीची निगा राखली होती.

जमिनीचा कस टिकवण्यास चिखलमय दलदलीत काम करताना, हातांच्या बोटातून रक्त वाहत होते. पायांच्या अंगठ्यातील नखात चिखल भरून बोटे सुजत होती. संध्याकाळी घरी आल्यावर घरगुती उपाय करून, परत सकाळी उठून शेतात जात होते.

आपल्या आरोग्याचे डॉक्टरही तेच असायचे. त्यांच्या अंगात आळस, भित्रेपणा नव्हता. आता ‘सुशेगाद’ हा शब्द आळशी या अर्थाने सांगितला जातो, पण आपले कष्टकरी पूर्वज त्या शब्दाचा खरा अर्थ - सुशेगाद म्हणजे समाधानी - खरोखर जगत होते.

त्यांनी डोंगरातील घळीतून वाहणारे पाणी कोणत्या प्रकारे शेती आणि बागायतीला पुरवण्यास मिळेल, हे इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी स्वतःचे वापरून कृषी लागवड केलेली आम्हांस पाहावयास मिळते. ओहोळाचे पाणी अडविण्यास नैसर्गिकपणा वापरला, त्याचे पुरावे ओहोळाच्या प्रवासात पाहून तोंडात बोटे घालावी लागतात.

उदाहरणादाखल मांडवीच्या तीरावरील खाजन शेतातील मोठ्या मानशी, सावईवेऱ्याचे शितळातळे, कुडणे गावातील सास्ताचा बांध आणि शेजो नदीच्या काठावरील चर, बांदोडा धोणशीतळे, बेतकी मंडोदरी तळे, सुर्लाचा शियाबांध, केरी - विजयादुर्गा तलाव, शिरोडा चिकणगाळ तलाव आणि सान्तइस्तेवच्या कुपान नामसा पहिल्यास पूर्वजांच्या कामाची माहिती कळते.

आज सिमेंट, पाषाण खडी आणि नदीतील खार रेती वापरल्याशिवाय इंजिनिअरांकडे बांधकाम होत नाही. पाणी अडवण्यास डोंगर फोडून पाषाण काढणे, नदी खोलून त्यात सिमेंट, रेती भरून बंधारे उभारणे अशाने पर्यावरणाला हानी पोहोचते, हे या उच्चशिक्षित, विद्वान माणसांना कोण सांगणार?

आमच्या पूर्वजांनी पर्यावरणाला नख लावण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यांनी झरा, ओहळ, खाडी, नदी यांचे वाहण्याचे मार्ग मोकळे ठेवले. त्यामुळे जलचरांचे रक्षण झाले, वाहणाऱ्या नद्यांचे पाणी स्वच्छ राहिले. हे पाणी सागराच्या लाटांत मिसळून सागरावरून वाहणारी हवा स्वच्छ, सुरक्षित राहिली. त्या हवेतून सागरात तापलेले पाणी बाष्पीकरणाने वर जाऊन पाऊस वेळच्यावेळी पडत होता.

चंद्र आणि पृथ्वीच्या चुंबकीय कर्षणाने समुद्राला सुकती भरती वेळोवेळी येत होती. पृथ्वीवरील महासागरांचे क्षेत्रफळ एकूण तीनशे पन्नास दशलक्ष चौरस कि.मी. आहे. त्या पाच समुद्रांनी पृथ्वीला वेढले आहे. सागरांमध्ये पृथ्वी जरी उंच दिसली तरी सागरांना भयंकर खोली आहे.

भूगोल शास्त्रज्ञांच्या मोजमापाप्रमाणे, प्रशांत महासागर चार हजार दोनशे ब्याऐंशी मीटर, अटलांटिक ३९२६ मीटर, हिंद ३९६३ मीटर, आर्क्टिक १२०५ मीटर, अटलांटिक ४००० मीटर आहे. जसे पृथ्वीला उंच डोंगर आहेत, त्याचप्रमाणे समुद्रांतही खोल दऱ्या डोंगर आहेत. पृथ्वीवरील पाण्याने तिचा मोठा भाग गिळंकृत करून सूर्याच्या उष्णतेने तापणाऱ्या वसुंधरेला थंडावा पुरवला आहे.

तिच्यावरील हवामान जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंची नेमणूक करते, त्यांची चाहूल प्रथम चातक पक्षी, चतकोर, बेडूक, टिटवी, कोकीळ, काजवे, जनावरे, मुंग्या, समुद्र, झाडे, वेली यांना लागते. उन्हाळ्याचे वसंताला हिवाळ्याचे कोजागिरीला आणि पावसाळ्याचे समुद्री लाटांना, पृथ्वीवरील निसर्गाचा हा सारा खेळ करण्यास पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.

ते पृथ्वीवर जड होते. सूर्याच्या उष्णतेने तापून हलके होत वर जाते. आणि परत वाऱ्याच्याच मदतीने जड होत परत पृथ्वीकडे झेपावते. म्हणून पाणी पदार्थ ‘कृष्ण कारस्थानी’ आहे असे म्हटल्यास काही गैर नाही!

आमच्या ओहोळांच्या प्रवासात डिचोली तालुक्यातील लाटंंबार्से ओहळ असल्याने प्रथम महाराष्ट्र राज्यातील आमाडगाव गाठावे लागले. त्या गावाच्या डोंगर भागात लाटंबार्से ओहोळाचा उगम दोन झऱ्यांनी होतो. आमाडगाव आणि काजऱ्या सपय या दोन्ही झऱ्यांचे पाणी वाहत खालच्या भागातील कोणीर ठिकाणी एकत्र होऊन खाली येते.

या परिसरातील अरण्याला पाणी देत पुढे ‘गणेशकोण’ परिसराला पाणी पुरवते. पुढे सोनारभाट परिसरातील जंगल, कुळागर आणि शेतीला पाणी पुरवून खाली जात पिस्ते परिसराची तहान भागवते. त्या पुढच्या प्रवासात हा ओहळ लाडफे गाव पार करून भटवाडी नानोडा परिसरात पोहोचतो.

त्या ठिकाणी त्याला खरपाल गावाकडून वाहत येणारा दुसरा ओहळ मिळतो. त्याचा उगम खरपालच्या डोंगरात होऊन तो वाहत कासारपाल भागात पोहोचतो. दोन्ही गावांच्या शेती, बागायती आणि वनसंपदेला पाणी पुरवतो आणि नानोडा भटवाडी परिसरात लाडफेच्या मुख्य ओहोळास मिळतो.

तिसऱ्या ओहोळाचा उगम लाडफेच्या भेडशेकोण परिसरात होतो. तो बागायती, शेती आणि जंगल भागाला पाणी पुरवत पुढे खालच्या भागात येताना त्याला चौथा ओहळ मिळतो ज्याचा उगम पेन्यार परिसरात होतो. तो डोंगरावरून धबधब्याच्या रूपाने खाली कोसळत पुढच्या प्रवासात कळसकोण भागाला पाणी देऊन पुढे कोसवा परिसरात पोहोचतो.

या भागाला पाणी देऊन सोनारभाटकडून भटवाडी नानोडा परिसरात मुख्य ओहोळात सामील होऊन त्रिवेणी संगम घडवतो. इथून पुढे ओहोळाचा प्रवाह मोठा होतो. नानोडा गावाची खालच्या परिसरातील शेती बागायती आणि जंगल वनसंपत्ती भागाला पाणी पुरवीत हा ओहळ मुख्य रस्ता पार करून अस्नोडा नदीला मिळतो.

त्या परिसरात त्याला अडवलपालचा ओहळ आणि आमठाणे धरणाचा ओहळ येऊन मिळतात. हे ओहळ एकत्र होत संगमाच्या रूपाने ‘पार नदी’ नाव धारण करून पुढे हळदोण आणि मये नदीस मिळतो.

या ओहोळांच्या काठावर खरपाल, आमाडगाव, लाटंबार्से, कासारपाल, नानोडा गावांतील स्थानिकांच्या पूर्वजांनी ओहोळातून वाहणाऱ्या पाण्यावर सरदवायंगण शेती बागायती आणि माळरानावर कुमेरी शेती करून ही गावे अन्नधान्यांनी ‘सुजलाम्, सुफलाम्’ बनवली होती.

पाळीव जनावरांच्या सहकार्याने नांगरणी करून त्यांच्या शेण खताच्या उपयोगाने भात, नाचणी, कुळीथ, पाकड, उडीद, वरी, सावा, तीळ, कांग अशा धान्यांचे पीक घेतले. करांदे, चिर्का, अळू, माडी, कणगी, सुरण ही कंदमुळे, कुवाळा, भोपळा, काकडी, टरबूज, कोकणदूधी, दोडगी, माट्टघोसाळी, भेंडी अशा भाज्या पिकवल्या. बागायतीत नारळ, सुपारी, केळी, आंबा, फणस, अननस, कोकम, काजू लागवडीने फळ बागायती फुलवल्या.

Water Stream
Murdi Khandepar Stream: सरस्वती नदीपात्रात भूकंप झाला, बर्फ कोसळला आणि काठावरील संस्कृती नष्ट झाली; मुर्डी खांडेपारचा ओहळ

लाडफेच्या डोंगरातील भागांना चरयानी, पास्को, कोणीर, काजऱ्यासपय अशी वेगवेगळी नावे आहेत. त्या डोंगरातील पेन्यार धबधब्याचे पवित्र पाणी शिगमोत्सवाच्या सातव्या दिवशी आणून गावातील देवांना आंघोळ (स्नान) घालतात.

नंतर संपूर्ण गावातील घरोघरी ते तीर्थ देतात. या डोंगरावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अळंबी फुलतात. लाडफे डोंगराच्या पायथ्याकडील वर्तुळात लाडफे, म्हावळिंगे, वन, बोर्डे, व्हाळशी, मुळगाव, नानोडा, कासारपाल गाव येतात.

Water Stream
Village Governance: आरोशीचा ‘सायब’! तो केवळ सासष्टीचा नाही, मिरजपर्यंतच्या संपूर्ण कोंकणच्या राजांना पराभूत करणारा होता

पूर्वजांनी त्या डोंगरातील पाण्यावर कृषीधान्य पिकवून पुढच्या पिढ्यांतील वंशजांना सुखाचा मार्ग दाखवला. या डोंगर परिसरात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. सरपटणारे प्राणी, हिंस्र जनावरे; अनेक प्रकारचे पशू, पक्षी आहेत. त्याशिवाय पाळीव प्राणी यांच्या साहाय्याने येथील पूर्वजांनी कृषी संस्कृती फुलवली. त्यांचे जीवन कष्टमय होते; पण स्वार्थी व स्वत:पुरते पाहणारे नव्हते.

हवे तेवढेच साठवून उर्वरिताचे दान करणारी त्यांची समृद्ध जीवनशैली होती. त्यांनी निसर्ग होता तसाच ठेवत समृद्ध कृषीसंस्कृतीला आमच्या हाती सोपवले. पण, आज त्यांचा हा वारसाच आम्हांस नकोसा झाला आहे. त्यांनी केलेले कष्टमय काम करण्यास आम्ही कमीपणा मानतो. एवढेच नव्हे तर कष्ट कमी करण्यासाठी निसर्ग ओरबाडतो. त्यांनी दिला होता तसाच निसर्ग, भूमी आणि संस्कृती टिकवणे आम्हांला जमत नाही, याचे अतीव दु:ख होते!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com