Sal River Pollution: गंभीर अवस्था! प्रदूषणामुळे 'साळ नदी'त प्राणवायूचे प्रमाण शून्य, कचरा-सांडपाण्यामुळे धोक्याची घंटा

Sal River Pollution: नदीच्या खालच्या प्रवाहात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण चक्क ‘शून्य’ नोंदवले गेले आहे. एका विशिष्ट निरीक्षण केंद्रावर सलग पाच महिने हीच विदारक स्थिती नोंदविली होती.
Sal River Pollution
Sal River PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : सासष्टीची जीवनवाहिनी समजली जाणारी साळ नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यांच्यातील दरी साळ नदीच्या सद्यस्थितीतून स्पष्टपणे समोर येत आहे.

नदीच्या खालच्या प्रवाहात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण चक्क ‘शून्य’ नोंदवले गेले आहे. एका विशिष्ट निरीक्षण केंद्रावर सलग पाच महिने हीच विदारक स्थिती नोंदविली होती. कोणत्याही जलचर जीवनासाठी प्राणवायूची ही पातळी अत्यंत घातक आहे. यामुळे नदीतील परिसंस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी साळ नदीच्या पद्धतशीर स्वच्छतेचे आणि पुनरुज्जीवनाचे आदेश दिले असले, तरी सरकारी आकडेवारी काही वेगळीच आणि चिंताजनक कहाणी सांगत आहे.

साळ नदीच्या पाण्याचा गढूळपणा ७९.७ एनटीयूपर्यंत पोहोचला आहे, जो कायदेशीर मर्यादेपेक्षा तिप्पट आहे. हेच प्रदूषित पाणी शेतात जात असल्याने पिकांच्या गुणवत्तेवर आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

केवळ कागदोपत्री आदेश देऊन साळ नदी वाचणार नाही. त्यासाठी प्रशासकीय उत्तरदायित्व आणि सार्वजनिक सहभागाची तातडीने गरज आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देत शेतकऱ्यांची शेती वाचविण्याची मागणी होत आहे.

Sal River Pollution
Mirabag: सर्वत्र धरणे, बंधारे बांधून गोव्यात बुद्धिमान माणसानेच राहायचे का? मीराबाग व विरोध करणारे गावकरी

सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रशासन उदासीन

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार निर्देश देऊनही सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्याबाबत मडगाव नगरपालिका आणि संबंधित प्राधिकरणांनी उदासीनता दाखवली आहे. जैवरासायनिक प्राणवायूची मागणी ६ मिलीग्रॅम प्रतिलीटरपर्यंत पोहोचली आहे, जी नदीच्या नैसर्गिक शुद्धीकरण क्षमतेपेक्षा जास्त आहे.

Sal River Pollution
गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

कचरा-सांडपाण्यामुळे प्रदूषण

नदी प्रदूषणामागे प्रामुख्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मासळी बाजारातील कचरा ही दोन मोठी कारणे आहेत. मडगावमधील एसजीपीडीए घाऊक मासळी बाजारातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी, माशांचे अवशेष आणि थर्माकोलचे बॉक्स थेट पावसाळी नाल्यांद्वारे नदीत जात आहेत.

याव्यतिरिक्त, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळील मॅनहोलमधून ओसंडून वाहणारे सांडपाणी थेट शेतात आणि नदीत मिसळत आहे. त्यामुळे फातोर्डासारख्या भागात पाणी कमालीचे दूषित झाले आहे.

यापूर्वीही या विषयावर अनेकदा वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित प्रशासनाने या प्रदूषणाची दखल न घेतल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com