युवकांची मानसिक अवस्था, दडपणे समजून घ्या!
आजच्या काळात युवकांमध्ये वाढणारे नैराश्य, तणाव आणि आत्महत्यांचे प्रमाण ही समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे. विशेषतः शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू ही केवळ आकडेवारी न राहता एक गंभीर सामाजिक वास्तव बनले आहे. गोव्यातील ‘बिट्स पिलानी’ या नामांकित शैक्षणिक संस्थेत २०२४पासून आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना या समस्येची तीव्रता अधोरेखित करते. अलीकडेच एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चर्चेनुसार तिने आत्महत्या केली आणि तिच्या सुसाइड नोटमध्ये तिने नैराश्यात असल्याचे नमूद केले आहे.
नैराश्य (Depression) हा विषय आज युवकांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बहुतांश वेळा आत्महत्येची कारणे म्हणून प्रेमसंबंध किंवा शैक्षणिक दबाव याकडेच पाहिले जाते. ही कारणे निश्चितच महत्त्वाची असली, तरी तीच एकमेव कारणे आहेत का, हा प्रश्न गंभीरपणे विचारात घेण्यासारखा आहे.
आजचे जग वेगाने तांत्रिक युगात प्रवेश करत आहे. नव्या सुविधा, नव्या संधी यांसोबत अपेक्षा आणि जबाबदाऱ्याही वाढत आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी जेव्हा उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेतो, तेव्हा तो केवळ विद्यार्थी राहत नाही, तर कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे वाहणारा जबाबदार घटक बनतो.
शिक्षणाची फी, परीक्षांचे शुल्क, लॅपटॉप किंवा मोबाइलसारखी साधने, हॉस्टेल किंवा प्रवासाचा खर्च-हे सर्व आपल्या कुटुंबाला परवडेल का, हा प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत असतो. अशा परिस्थितीत स्वप्न पूर्ण करण्यासाठी उचललेले पाऊल हे अत्यंत धाडसी पण तितकेच तणावपूर्ण ठरते.
यासोबतच शैक्षणिक दबाव तर असतोच, पण समवयस्कांमधील स्पर्धा आणि तुलना म्हणजेच peer pressureदेखील युवकांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करते. साधारणतः १४ ते २५ वयोगटात व्यक्ती सतत स्वतःला इतरांमध्ये fit करण्याचा प्रयत्न करत असते-शाळा, कॉलेज किंवा नोकरी कुठेही असो. मला स्वीकारले जाईल का? मी इतरांइतका सक्षम आहे का? अशा प्रश्नांची भीती युवकांच्या मनात घर करून बसते.
शाळेपासून विद्यापीठापर्यंतचा प्रवास हा एका सामान्य विद्यार्थ्यासाठी सहज नसतो. मानसिक तणाव, अपेक्षांचा भार आणि अपयशाची भीती यामधून जाणे अनेकदा असह्य ठरते. युवकांमधील नैराश्य हे केवळ एका कारणामुळे निर्माण होत नाही तर जैविक, सामाजिक आणि मानसिक घटकांच्या गुंतागुंतीच्या परिणामातून ते उद्भवते. तणावपूर्ण जीवनघटना, तीव्र शैक्षणिक दबाव, सोशल मीडियावरील सततची तुलना, हार्मोन्समधील बदल, बालपणीचे न सुटलेले आघात, बुलींग, कौटुंबिक वाद आणि योग्य आधारव्यवस्थेचा अभाव-हे सर्व घटक नैराश्याची जोखीम वाढवतात.
महत्त्वाची बाब म्हणजे नैराश्यात गेलेल्या युवकाला स्वतःलाही मदतीची गरज असल्याची जाणीव असते. त्याला ऐकून घेणारा, समजून घेणारा आणि आधार देणारा कोणी तरी हवा असतो. मात्र अनेकदा आजूबाजूची परिस्थितीच अशी असते की त्याच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी जागा मिळत नाही.
म्हणूनच मानसिक आरोग्याबाबत सामाजिक पातळीवर व्यापक जागृती निर्माण होणे अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्य सुदृढ असेल तरच शारीरिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते.
आपण जेव्हा युवा शक्तीची चर्चा करतो, तेव्हा त्या युवकांची मानसिक अवस्था, त्यांचे शैक्षणिक दडपण, समुपदेशनाचा अभाव आणि बेरोजगारीसारख्या समस्या समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
मृणाली राऊत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

