Ponte Conde de Linhares: आग्र्यात शहाजहान ताजमहाल बांधत होता, तेव्हा गोव्यात पोर्तुगिजांनी पूल बांधून पूर्ण केला

Panaji patto raibandar bridge: जांभ्या दगडांनी (laterite stones) हा पूल बांधण्यात आला. हा पूल बांधताना ‘आर्क’ ची संकल्पना वापरण्यात आली.
Panaji patto raibandar portuguese era bridge
Panaji patto raibandar bridgeDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

पणजीतील पाट्यावरून पानवेलपर्यंत (रायबंदर) जाणारा मांडवीनदी जवळचा समांतर रस्ता हा रस्ता नसून तो पूल आहे हे अनेकांना माहीत नसेल.

पोर्तुगिजांनी हा पूल १६३४साली बांधला. हा पूल म्हणजे अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला पाहिजे. आग्र्यात शहाजहान ताजमहाल बांधत होता तेव्हा गोव्यात हा पूल बांधून पूर्ण झाला. पाटो-पानवेल पूल वर्षभरात बांधून झाला. ह्या पुलाचे नाव ‘पॉन्ते अ‍ॅन्ड दी लिन्हारेस’. ह्या पुलाची लांबी ३.२ किलोमीटर आहे.

जांभ्या दगडांनी (laterite stones) हा पूल बांधण्यात आला. हा पूल बांधताना ‘आर्क’ ची संकल्पना वापरण्यात आली. ह्या पुलाला ३८ कमानी आहेत. मोगलांनी ताजमहाल सारख्या शोभेच्या वास्तू रयतेच्या पैशातून बांधल्या तर पोर्तुगिजांनी पाटो पूल, तिनई घाटातून जाणारी वास्को - लोंढा रेल्वे ह्यासारखे लोकोपयोगी प्रकल्प अमलात आणले हा गुणात्मक फरक लक्षात घेतला पाहिजे.

मांडवी नदीच्या खाजन जमिनीत बांधलेला हा पूल म्हणजे निसर्गाचा विध्वंस नसून निसर्गात केलेला सकारात्मक बदल (positive intervention) आहे. त्यावेळी नॉर्मा व क्लॉॅड आल्वारिस, सबिना मार्टिन्स, रमेश गवस, डॉ. ऑस्कर रिबेलो ह्यासारखे पर्यावरण मूलतत्त्ववादी (environment fundamentalist) नव्हते हे आपले भाग्य. अन्यथा ह्या लोकांनी पाटो-पानवेल पुलाला कडाडून विरोध केला असता.

पाटो-पानवेल पुलाप्रमाणेच मांडवी व जुवारी नद्यांना जोडणारा कुंभारजुवे कालवा हे गोव्याचे अनोखे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. कुंभारजुवे कालवा हा मानवनिर्मित आहे असा दावा काही लोक करतात पण तो चुकीचा आहे. शेकडो वर्षांपूर्वी गोव्यात झालेल्या तीव्र भूकंपाने तिसवाडी तालुका मूळ जमिनीपासून पश्चिमेला सरकला व हा निसर्गनिर्मित कुंभारजुव्याचा कालवा निर्माण झाला हे पटण्यासारखे आहे.

Panaji patto raibandar portuguese era bridge
Goan Folk Art: माळ्याचे मळशेबि शिंपताल्यो गे बाय! कळशी फुगडी, मांडो, समई नृत्य; लोककला म्हणजे नेमके काय?

तिसवाडी तालुक्यातल्या पूर्वेला असलेल्या कुंभारजुवे कालव्यामुळे पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला मांडवी नदीचे पात्र आणि दक्षिणेला जुवारी नदीचे पात्र ह्या सीमा असलेला तिसवाडी तालुका भौगोलिकदृष्टया बेट झाला.

किल्ल्याभोवती असलेल्या खंदकात पाणी सोडून ‘मोट’ (moat) तयार करतात त्याप्रमाणे वरील नैसर्गिक सीमांना तिसवाडी तालुक्यातील जुने गोवे व नंतर पणजी ह्या पोर्तुगीजांच्या राजधान्यांना नैसर्गिक संरक्षण मिळाले. पोर्तुगिजांनी कुंभारजुवे कालव्यात मगरीही सोडल्या. कुंभारजुवे कालवा आडवा आल्यामुळे फर्मागुढीहून जुन्या गोव्याकडे कूच करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याला तिसवाडी तालुक्यात प्रवेश करता आला नाही. पोर्तुगीजांच्या दृष्टीने कुंभारजुव्याचा कालवा हे दैवी वरदान होते. कुंभारजुवे कालव्याबद्दल अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

Panaji patto raibandar portuguese era bridge
Old Borim Bridge: 200 वर्षांपूर्वीचा पूल, पोर्तुगीजांनी बॉम्बने उडवला होता भाग; जुन्या आठवणींना देतोय उजाळा

कुंभारजुवे कालव्यामुळे मांडवी नदीतून जुवारी नदीत जलवाहतूक करणे शक्य झाले. विशेषतः गोव्याच्या उत्तर पूर्वेला असलेल्या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या बार्जिसांना कुंभारजुवे कालव्यामुळे मुरगांव बंदरात जाणे सोपे झाले.

पाटो-पानवेल पुलामुळे पणजीहून रायबंदरपर्यंत वळशाने जाणारा रस्ता बंद होऊन पणजी रायबंदरमधील अंतर सुमारे ३ किलोमीटर्सने कमी झाले. पाटो - पानवेल पुलाची सदृश माहिती गोमंतकीय विद्यार्थ्यांना, स्थानिकांना व पर्यटकांना दिली पाहिजे.

आज पाटो-पानवेल पुलाखालच्या कमानी बुजून ह्या पुलाचा तथाकथित रस्ता झालेला आहे. पाटो - पानवेल पुलाला त्यांचे मूळ रूप देता येईल का? हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com