

नोकरी-धंद्याच्या निमित्ताने गावापासून दूर असलेल्या प्रत्येक माणसाला गावाबद्दलची ओढ सुटत नाही, मलाही तसा अनुभव आहे. खर सांगायचं झाल्यास माझ्या कवितांतूनही इथली माती, इथली माणसं, इथला निसर्गसुंदर असा ओशेल-शिवोली हा गाव, शब्द-शब्द व्यापून राहिला आहे.
या इथल्या मातीने मला बरच काही दिलेलं आहे. माझ्या घराशेजारी हारीने उभ्या असलेल्या झाडापेडांनी , माडांनी मला खूप काही दिलंय. या झाडांच्या सावलीत बसूनच मी इथल्या प्रत्येक माणसांकडे निरखून पाहत असतो.
गावातील मुख्य व्यवसाय हा मासेमारी व काही प्रमाणात शेती, व काजूची लागवड तसेच इथली माणसं फणसासारखी वरून ओबड धोबड काटेरी वाटत असली तरी आतून फणसाच्या गरांसारखी गोड आहेत.
इथे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात या इथल्या माणसांना मनापासून आनंद होतो. इथली माणसं फार कष्टकरी आणि अध्यात्मिक विचारांची आहेत. म्हणूनच इथल्या माणसांवर इथल्या मातीवर व निसर्गसुंदर गावावर माझे नितांत प्रेम आहे.
गावातून वाहणारी शापोरा नदी अगदी पूर्वेकडचा विठूसारखा कमरेवर हात ठेवलेला वायडोंगर हा तर माझा बालपणीचा सवंगडी आहे. कित्येकवेळा मी होडी वल्हवत जाऊन ह्या वायडोंगराच्या पायथ्याशी बसायचो. हा वायडोंगर मला कधी कधी ‘औदुंबर’ या बालकवींच्या कवितेची आठवण करून देतो.
कवितेतील ‘औदुंबरा’ सारखाच पाय पाण्यात सोडून आपणही बसलोय, असा भास होतो.एखाद्या संध्याकाळी वायडोंगर पाहतो, तेव्हा कवितेच्या ओळी सहज ओठांवर येतातच.
माझ्या गावात श्री देव ब्राह्मणाचे मंदिर आहे, शिवाय श्री कालिका देवीचे मंदिराची पुनर्बांधणी होत असून ते काम अंतिम टप्प्याकडे चालले आहे. ब्राह्मण देवाच्या मंदिरापुढे एक तळी आहे, जिला लहानपणापासून देवतळी म्हणत आलोय. हा आमच्या गावचा ठेवा आहे.
याशिवाय श्रीरामाचे मंदिर आहे, जिथे नित्य रामनामाचा जप सुरू असतो. श्री देवी कालिका मंदिरात नेहमीच उत्सवांचा, सणांचा सोहळा सुरू असतो. काला, शिवरात्र, नवरात्रोत्सव, असे नाना उत्सव-सण सदोदित सुरू असतात.उत्सवांत नाटकांचे सादरीकरण हा तर इथल्या लोकांचा जीवाभावाचा अन् अविभाज्य भाग आहे.
हल्ली गावाकडची माणसं नोकरी, व्यवसायाच्या निमित्त गावापासून प्रसंगी दूर होतात, पण मन मात्र गावाकडेच ओढ घेत राहतं. कधी-कधी खिन्न होतं. पण गावाकडे पावलं वळताच पुन्हा माणूस ताजातवाना होतो. माझ्या गावातल्या गावकऱ्यांना सध्या त्यांचे घर बांधून राहण्याएवढीच काय ती जमीन उरलीय. म्हणून बाहेरच्या लोकांना विकायचा संबंधच येत नाही. पण गावालगतच्या भागातल्या काही लोकांनी पैशांच्या लोभापायी परप्रांतीयांना जमिनी विकल्या, परिणामी डोंगरं सपाट होताना दिसताहेत.
झाडांची कत्तल पहायला मिळते,त्यातून सिमेंटचे जंगल उभे राहताना दिसते, ते पाहताना मनाला वेदना होतात.
म्हणून म्हणावे वाटते,
‘आता मातीसाठी तुटे जीव’
म्हणणारे कुठे शोधायचे?
माती कपाळी लावणाऱ्यांचे
देव तरी कुठे शोधायचे?
उदय ताम्हणकर, कवी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.