
तेनसिंग रोद्गीगिश
जर आपण हे मान्य केले की ‘कर्हाडे ब्राह्मण’ हा देशस्थांचाच भौगोलिकदृष्ट्या वेगळा गट आहे, तर गोवा आणि कोकण भागात ब्राह्मणांचे फक्त तीन वर्ग आहेत: देशस्थ, चित्पावन आणि सारस्वत. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पंडितांच्या दरबाराच्या कथित निकालात आणि श्येनाजातिधर्मनिर्णयात उद्धृत केलेल्या पद्मपुराण कथेचा उर्वरित भाग आपल्याला ब्राह्मणांची वर्गवारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकतो.
देशस्थांपासून सारस्वत वेगळे केल्यानंतर, चांगल्या ब्राह्मणापासून वाईट ब्राह्मण वेगळे केल्यानंतर, धर्म न राखणाऱ्यांना धर्म राखणाऱ्यांपासून वेगळे केल्यानंतर, श्येनाजातिधर्मनिर्णय शिवाजी महाराजांच्या दरबारातील पंडितांनी दिलेल्या निर्णयाची नोंद करतो.
पद्मपुराणातील कथेनुसार, वाचलेले ब्राह्मण आपापल्या प्रदेशात परतले आणि त्यांनी आपले कुटुंब वाढवले. तथापि, बाजाचे मांस खाऊन अपवित्र झालेल्या ब्राह्मणांनी, म्हणजेच शेणवी (सारस्वत) ब्राह्मणांनी, ज्यांनी त्यांचे धर्म राखले होते, अशा कृष्णा नदीच्या काठावरील शुद्ध ब्राह्मणांना (कर्हाडे / देशस्थ) या पुढे कसे वागावे, याविषयी विचारले.
सहानुभूती म्हणून, शुद्ध ब्राह्मणांनी पतित ब्राह्मणांना तीन गोष्टी करण्यास अनुमती दिली. यजन (त्यांच्यासाठी यज्ञ करणे), अध्यायन (वेद शिकणे) आणि दान (दान करणे). म्हणून, त्यांना त्रिकर्मी ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले; त्यांना फक्त तीन कर्मांसाठी पात्र ठरवले गेले. खरे तर, शास्त्रात त्रिकर्मी ब्राह्मणांची तरतूद नाही; सर्व ब्राह्मण हे षट्कर्मी मानले जातात, म्हणजेच जे सहा कर्मे करतात : यजन (स्वत: यज्ञ करणे), याजन (इतरांसाठी यज्ञ करणे), अध्ययन (वेद शिकणे), अध्यापन (वेद शिकवणे), दान (दान देणे) आणि प्रतिग्रह (दान घेणे).
क्षत्रिय आणि वैश्य हे त्रिकर्मी मानले जातात. म्हणून या नियमाने सारस्वतांना क्षत्रिय/वैश्य दर्जा दिला गेला. परिणामी सारस्वत ब्राह्मणांना व्यापार, लेखन, शेती आणि राजसेवा असे व्यवसाय करावे लागले. ‘शुद्ध’ ब्राह्मण, म्हणजेच कर्हाडे ब्राह्मण, यांनी जाहीर केले की ते आणि फक्त तेच, सारस्वत ब्राह्मणांचे पुजारी म्हणून काम करतील, त्यांच्यासाठी यज्ञ, अध्यापन आणि प्रतिग्रह करतील. (संदर्भ : पाटील, २०१० : कॉन्फ्लिक्ट, आयडेन्टिटी अँड नॅरेटिव्हस् - द ब्राह्मण कम्युनिटिज ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम द सेव्हेन्टींथ थ्रू नाइन्टीन सेंच्युरीज, १३२).
या कथेच्या आधारे, शिवाजी महाराजांच्या दरबारातील पंडितांनी दिलेल्या निकालात असा निष्कर्ष काढला आहे की सारस्वतांनी त्यांचा ब्राह्मण दर्जा गमावला होता; आणि धर्मशास्त्रानुसार, आणि सारस्वत वैश्यांसाठी योग्य असलेल्या पूर्वपरंपरागत आचारां(पारंपारिक व्यवसाय)मध्ये गुंतले होते हे लक्षात घेता, निकालात असे म्हटले आहे की सारस्वत वैश्य वर्गातील आहेत. पुढे असे म्हटले आहे की सारस्वतांनी श्राद्ध समारंभ करण्यासाठी एक कर्हाडा ब्राह्मण पुजारी नियुक्त करावा.
सारस्वतांच्या घरचे अन्न खाण्यासही मनाई आहे. शिवरायांच्या काळात देशस्थ ‘प्रशासकीय गाभ्यावर’ वर्चस्व गाजवत होते आणि कुरु-पंचाल संहितेचे सर्वांत विश्वासू होते या वस्तुस्थितीच्या संदर्भात आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे. पेशव्यांच्या काळात चित्पावनांनी त्यांना बाजूला केले असले तरी, त्यांच्या ‘प्रतिष्ठित धार्मिक दर्जा’चा वापर नंतरही होत राहिला. कुरु-पंचाल ब्राह्मणांनी भारतीय उपखंडातील धार्मिक विधींच्या जागेवर कायमचे आपले वर्चस्व गाजवले.
निर्णय प्रत्यक्षात पंडितांच्या परिषदेने दिलेल्या निर्णयावर आधारित होता की नाही हे महत्त्वाचे असले तरी, त्याच्या आदेशाचा सारस्वतांवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे असे दिसते. परंतु आपल्याला माहीत नाही की ते सक्तीमुळे होते की निवडीमुळे. वैश्यांचे पूर्वपरंपरागत आचार असलेला व्यापार आणि शेती यांत सारस्वत सक्रिय झाले.
त्यांनी लेखन, राजसेवा आणि प्रामुख्याने व्यावहारिक विषयांचे शिक्षण चालू ठेवले. परंतु वेदांचे अध्ययन करणे त्यांनी सोडून दिले. ते देवकार्य, पितृकार्य शुद्ध ब्राह्मणांकडून करून घेऊ लागले. त्यांच्या मंदिरांमध्ये ‘शुद्ध’ ब्राह्मण पुजारी नियुक्त करत असत. सारस्वतांचा मांसाहार सुरूच ठेवला, ज्यामुळे ते अभोज्य झाले. आपण नियुक्त केलेल्या कर्हाडे पुजाऱ्यांपेक्षा, सारस्वतांनी स्वतःला कधीच कनिष्ठ मानले नाही; उलट त्यांनी त्यांना ‘भट’, ‘पुजारी’ म्हणून तुच्छ लेखले.
सारस्वतांना यज्ञ, अध्यापन आणि प्रतिग्रहासाठी योग्य मानले जात नव्हते किंवा त्यांनी स्वत:हून ती कर्मे न करण्याचा निर्णय घेतला. जर त्यांचा हा स्वत:चा निर्णय असेल तर प्रश्न उद्भवतो, का? सारस्वतांनी षट्कर्मे करणारे ब्राह्मण म्हणवून घेणे का नाकारले? त्यांचा मत्स्याहार, मांसाहार हे कदाचित त्यामागचे प्रमुख कारण असावे.
देशस्थ ब्राह्मणांप्रमाणे, ते जैनांच्या प्रभावाखाली आले नाहीत आणि म्हणूनच मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून त्यांना मिळालेल्या मूळ माशांच्या-मांसाच्या आहाराचे सेवन त्यांनी तसेच पुढेही सुरूच ठेवले. परंतु ब्राह्मण म्हणून इतरांनी त्यांना त्यांच्या मूलभूत कर्मांपासून वंचित ठेवणे; तसेच पौरोहित्य करण्याऐवजी व्यापार-उदिमास प्राधान्य देणे अनाकलनीय आहे.
कर्हाडे हे मूळचे देशस्थच होते, हे आता पटवून देणे खूप कठीण आहे. कारण अर्ध्या सहस्राब्दीपेक्षा जास्त काळापासून त्यांच्या ओळखीत लक्षणीय बदल झाले आहेत. वेगवेगळ्या राजवंशाच्या आश्रयास राहिल्यामुळे असेल किंवा सारस्वतांशी त्यांचे मतभेद, वाद यामुळे त्यांची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. या टप्प्यावर एक साधा प्रश्न मनात येतो: कर्हाड्यांचा विशेषतः सारस्वतांशी इतका दीर्घकाळ वाद का होता? कदाचित, हितसंबंध आणि अहंकार जपण्यासाठी कर्हाडे आणि सारस्वत यांच्यात संघर्ष होत राहिले असावेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.