
काळ ज्या वेगाने बदलतोय, त्याच वेगाने नव्या काळातील मुले, त्यांचे वागणे, त्यांची भावस्पंदने, त्यांचे आचार–विचार अशा सर्वच गोष्टी बदलत चालल्या आहेत. अशा काळात मुलांचे योग्यरित्या संगोपन करून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी प्रामुख्याने आई–वडिलांवर असते आणि त्यांनी ती योग्यरीत्या पेलली तर निश्चितच त्यांच्या मुलांचे भविष्य घडते.
सध्याचा जमाना इंटरनेटचा आहे. त्यामुळे न कळत्या वयातही मुलांच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप अशा गोष्टी असल्याचे आणि तनमन अर्पून त्यात ती दिवसरात्र रममाण झाल्याचे चित्रही घराघरांमध्ये दिसून येत आहे. मोबाईल, लॅपटॉप या साधनांना सध्याच्या काळात वाईट म्हणता येणार नाही. काळाची ती गरजच बनलेली आहे. पण, आपली मुले या साधनांचा स्वत:च्या भल्यासाठी कसा वापर करतील, याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मोबाईलमुळे मुले बिघडत आहेत, असा प्रचार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. पण, त्याच मोबाईलचा कल्याणासाठी वापर करून विविध क्षेत्रांमध्ये चमकत असलेली असंख्य मुले–मुलीही समाजात दिसतात. दुर्दैवाने कधीकधी पालकच मोबाईलवेडे झाल्याने त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळेच अनेक घरांतील मुले बिघडत असल्याचेही दिसून येत आहे.
आपल्या पाल्यांचे पालक कमी आणि मित्र–मैत्रीण बनणे जास्त, असा हा काळ आहे. पालक जेव्हा आपल्या मुलांचे मित्र बनतात, त्याचवेळी मुले आपल्या मनातील विचार, चांगल्या–वाईट भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्याकडूनच त्यांचे निरसन करून घेत असतात. आपल्या मुलांचे भवितव्य घडवणे हे पालकांच्याच हातात असते.
त्यामुळे पालकांनी स्वत:च्या व्यस्ततेतून वेळ काढून दिवसातील काही तास आपल्या मुलांसाठी दिले, त्यांच्यावर सुसंस्कार केले, तर भावी पिढीचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल.
संगीता कांबळे, पणजी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.