

गोव्याच्या इतिहासाचा शोध घ्यायचा झाला, तर या गोमंत भूमीला परशुराम निर्मित प्रदेश का म्हटले जाते, तेथपर्यंत जावे लागेल. दक्षिण गोव्यातील सांगे हा तालुका डोंगर, नदी, झाडे, तलाव, धबधबे, साळावली धरण, प्राचीन मंदिरांनी नटलेला आहे. त्यात रिवण हे गाव अत्यंत सुंदर वनश्रीने नटलेले ज्याला पूर्वी ‘ऋषीवन’ म्हटले जाई.
इथे अनेक ऋषी मुनींनी साधना केल्याचा उल्लेख सापडतो. येथून ३ किलोमीटर अंतरावर कुशावती नदीच्या तीरावर एक अत्यंत प्राचीन श्री दामोदर देवस्थान वसलेले आहे. याचा इतिहास असा आहे, हे देवस्थान मूळ मठग्राम म्हणजे मडगावचे. इ. स. १५६७ च्या सुमारास पोर्तुगीजांनी केलेल्या बाटाबाटीच्या वेळी मठग्रामच्या महाजन वर्गाने तेथील देवता पोर्तुगीज हद्दीबाहेर आणून जांबावली येथे राजे सौंदेकरांच्या हद्दीत स्थापित केल्या.
अशाप्रकारे कुशावती नदी तीरावरील जांबावली या छोट्याशा गावाला धार्मिक स्वरूप व महत्त्व प्राप्त झाले. येथे अनेक उत्सव साजरे होऊ लागले. पिंडीका , रामनवमी, वैशाख पौर्णिमा, श्रावण सोमवार, नवरात्र उत्सव, दसरा, आश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, तुलसी विवाह, महाशिवरात्री, होळी, शिशिरोत्सव, सुप्रसिद्ध गुलालोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. त्याशिवाय अशा रम्य परिसरात गोमंतकाच्या लोककलेने जन्म घेतला.
‘राम’ हे लोककलांचे प्रमुख दैवत मानले गेले. मांडो, धुलपद, देखणी, ओवी, धालो, फुगडी हे लोकसंगीताचे प्रकार ह्या ठिकाणी पहावयास मिळतात. गावात विशिष्ट ठिकाणी मोकळी जागा शेणाने सारवून धालोचा मांड सजू लागतो. नऊवारी लुगडे नेसून तरूणी पासून वृद्ध स्त्री या अंबाडा त्यावर अबोलीचा वळेसर, दागदागिने, नाकात मोत्याची नथ घालून ‘धालो धालो गे...’ हे सूर मांडावर घुमू लागतात.
मग कालोत्सव होतो. त्यनंतर पेरणी जागर म्हणजे आपल्या देशातील मुखवट्यांच्या कलेच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या अत्यंत पुरातन नृत्य नाट्याचा विचार म्हणजे पेरणी जागर. त्यात दशावतारी कालो, गवळण काला, संकासूर काला, रणमाले असे लोकनाट्याचे प्रकार दिसतात. अशा लोककला या गावात अजूनही टिकून राहिलेल्या दिसून येतात.
‘एक गाव एक विहीर’ या संकल्पनेतील विहीर गावाच्या मध्यभागी दिसते. जेथून संपूर्ण गावातील महिला पाणी भरण्यासाठी येत असत. घरोघरी आता नळ आले आहेत. नदीवर गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी जात. श्री दामबाब पालखीतून ह्या पाणवठ्यावर अजूनही जातो.
पणत्या पेटवून आरास केली जाते. आवळा भोजनासाठी श्री दामोदराची पालखी वनात आवळ्याचा झाडाखाली अजूनही जाते. कोणत्या ना कोणत्या सणाउत्सवानिमीत्त वर्षातील कित्येक दिवस अगर शाळेत महाप्रसाद चालू असतो.
अशा प्रकारे श्री दामबाब हा मठग्रामवासीयांचे दैवत जांबावलीच्या ह्या रम्य परिसरात स्थायिक झाल्याने जांबावलीला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या गुलालोत्सवात संपूर्ण परिसर गुलालाने गुलाबी रंगात रंगून जातो.
रजनी अरुण रायकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.