
सर्वेश बोरकर
रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर वसलेला किल्ला. चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध हा चंद्रकोर अर्ध वर्तुळाकार किल्ला आहे. याच किल्ल्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात.
जझीरा (बेट) या अरबी शब्दावरून जंजिरा हे नाव रूढ झाले असावे असे मानले जाते. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख आढळतो. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये व त्याच्या कमानीवर अरबीत कोरीव लेख आहे.
जंजिरा कोटाच्या तटाला दोन किंवा तीन मजली २७ मीटरच्या अंतराने बांधलेले २२ बुरूज आहेत. त्यांतून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारूगोळा ठेवण्याची ती बहुतेक असावी.
तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या जवळच कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिम खानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे.
अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करूनही अजिंक्य राहिलेला होता. पंधराव्या शतकाच्या मध्यास अॅबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले. अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जात.
त्यांना सौदी असेही म्हणत. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगिजांनी हिंदुस्थानात आणले; तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्ध झाले.
जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारूंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला असा एक उल्लेख सापडतो. बहमनी सुलतानांच्या कारकिर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला; पण यश मिळाले नाही.
बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९०मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. जंजिरा किल्ल्याची डागडुजी करून याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला व त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले. उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे.
पुढे १६००मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने (१५४९- १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला. १६१८मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले.
त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२०मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला व सिद्दी अंबर विजापूरचा ठाणेदार झाला.
जंजिऱ्याच्या पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापारासाठी व मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी होऊ लागला. वझीर सिद्दी अंबर १६४६मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला.
त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर बनला. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. म्हणून १६७०मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगिजांनी सिद्दीस गुप्तपणे दारूगोळा पुरविला तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला.
सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करून फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारून मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली.
त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही छत्रपती शिवाजी महाराजांना यश लाभले नाही.
त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करून जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी १६८२मध्ये जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते जमले नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.