

‘गोमन्तक टीव्ही’वर प्रजल साखरदांडे यांची राजू नायक यांनी घेतलेली मुलाखत, त्यांच्याशी साधलेला संवाद ही केवळ एक चर्चा नव्हती, तर आपल्या विस्मरणात गेलेल्या इतिहासाकडे डोळे उघडून पाहायला लावणारा प्रवास होता. पाठ्यपुस्तकांत ज्यांची नावे कधीच आली नाहीत, ज्यांच्या त्यागाला कधीही योग्य सन्मान मिळाला नाही आणि ज्यांच्या कथा हळूहळू लोकस्मृतीतून पुसट होत चालल्या आहेत, अशा स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सखोल चर्चा ऐकताना मन भरून आले.
स्वातंत्र्यसैनिकांनी काढलेल्या हालअपेष्टा, सोसलेली उपासमार, भोगलेला कारावास आणि स्वत:च्या संसाराची राखरांगोळी करणारे अपार नुकसान सहन केले. हे सर्व त्यांनी सत्ता किंवा प्रसिद्धीसाठी नव्हे, तर स्वतंत्र गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आपले तारुण्य, कुटुंब आणि प्रसंगी प्राणही अर्पण केले. गोवा मुक्तिदिनानिमित्त जरी ही मुलाखत असली तरी यातून गोव्यातील तरुणांमधील वाढत्या बेरोजगारीचे जळजळीत वास्तवही समोर आले.
शिक्षित आणि सक्षम असूनही अनेक गोमंतकीय तरुणांना आपल्या मातीतच स्थिर रोजगार मिळवणे कठीण होत आहे. त्याच वेळी, भक्कम आर्थिक ताकद असलेले बाहेरचे लोक हळूहळू व्यवसाय, नोकऱ्या आणि स्थानिकांसाठी असलेल्या संधींवर ताबा मिळवत आहेत. यामुळे असंतोष, असुरक्षितता आणि आपल्याच भूमीत परके झाल्यासारखी भावना गोमंतकीय तरुणांत निर्माण होत आहे.
गोव्याची जमीन आणि ओळख हळूहळू गोमंतकीयांच्या हातातून निसटत चालली आहे. कधी दबावामुळे, कधी मोहामुळे, तर कधी असहायतेमुळे गोमंतकीय आपली शतकानुशतके जपलेली कौटुंबिक जमीन बाहेरच्या लोकांना, विशेषत: दिल्लीतल्या लोकांना विकू लागले आहेत. केवळ जमीन बाहेरच्यांच्या ताब्यात जाणे, एवढाच याचा सीमित परिणाम नाही. जमीन जाण्यासोबतच गोव्याची संस्कृती, भाषा, परंपरा आणि जीवनशैलीही झपाट्याने लोप पावत आहे.
कधी काळी आत्मीयतेने भरलेला गोवा आता माणसांपेक्षा नफ्याला महत्त्व देणाऱ्या व्यापारी झुंडशाहीत बदलत आहे. हीच वाटचाल सुरू राहिली, तर पुढच्या पिढ्यांना कदाचित दहन, दफनापुरतीच जमीन उरेल; पण गोव्याला खऱ्या अर्थाने गोमंतकीय बनवणारी ओळख मात्र हरवून जाईल. हा सशक्त आणि अर्थपूर्ण विषय निवडल्याबद्दल ‘गोमन्तक टीव्ही’चे मनापासून कौतुक.
विस्मरणात गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आजच्या गोमंतकीय पिढीला करून देणे आणि त्यांच्या बलिदानांचा आजच्या सामाजिक वास्तवाशी संबंध जोडणे यासाठी धैर्य आणि संवेदनशीलता लागते. हा विषय केवळ माहिती देणारा नाही, तर अंतरात्म्याला जागे करणारा आहे. लोकांना विचार करायला लावणारा, आदर जागृत करणारा, आणि आपला इतिहास व ओळख जपण्याची जबाबदारी स्वीकारायला प्रवृत्त करणारा हा कार्यक्रम प्रसारीत केल्याबद्दल ‘गोमन्तक टीव्ही’चे मनापासून आभार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.