
Goa Tourist Numbers
गेल्या काही वर्षांपासून मंत्री स्तरावर निवेदने होत आहे की गोवा पर्यटन आम्ही गुणवत्ता केंद्रित बनवणार आहोत. असे असताना गोव्यातील पर्यटकांची संख्या घटते आहे असे दर्शवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे गोव्याची झोप का उडायला हवी? अशाप्रकारच्या सोशल मीडिया पोस्टना कायदेशीररित्या उत्तर देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत आणि किमान एका पोस्टच्या विरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे. आताचे वृत्त हे आहे की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना गोव्यातील पर्यटनाचे चित्र योग्यरित्या चित्रीत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यात एक विसंगती आहे, जिचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे. विसंगती ही की दर्जेदार पर्यटक गोव्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याबद्दल चिंता गोव्याने का करावी? पर्यटकांच्या संख्येत होणारी घट ही गुणवत्तापूर्ण पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्याची उत्तम संधी नव्हे काय? ‘आमचे लक्ष संख्येवर नाही. आम्ही संख्येपेक्षा गुणवत्तेवर भर देतो. अधिक खर्च करणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणे आणि त्यांना वैविध्यपूर्ण अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे’ हे आपल्या पर्यटन मंत्र्यांनी एका मुलाखतीत केलेले अलीकडीलच वक्तव्य आहे.
गोव्यातील बहुतेक लोकांना या विधानामुळे नक्कीच आनंद झाला असेल. परंतु दर्जेदार पर्यटनाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रवाशांची संख्या कशी कमी होईल हेच पाहिले पाहिजे. विसंगती पुढे आणखीनही आहे- गोव्याला दर्जात्मक पर्यटन हवे आहे परंतु चार्टर टरिझम, बजेट टुरिझम यामुळे गोव्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्याचे काय? ते नको आहे पण त्याचा प्रचार मात्र आम्ही करतो आहोत. खरे तर गोव्याला असे पर्यटक हवे आहेत जे इथे जास्त काळ राहतील आणि जास्त खर्च करतील. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत झालेली घट ही या उद्योगातील व्यावसायीकांसाठी आणि दर्जेदार पर्यटनावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी आलेली एक उत्तम संधी आहे असे आपण मानायला हवे.
गोव्यात आज दोन विमानतळ, एक बंदर, एक प्रमुख रेल्वे जंक्शन आणि महामार्ग आहे हे वास्तव आहे. पायाभूत सुविधांमुळे पर्यटनाला अधिक उंचीवर नेण्याची क्षमता गोव्याकडे आहे परंतु या पायाभूत सुविधांमुळे अधिक पर्यटकही गोव्यात येणार आहेत. गुणवत्ता वाढीसाठी आपण पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. किनारी भागातील रस्त्यांच्या जाळ्याकडे तसेच समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गांकडे आपले विशेष लक्ष असायला हवे. गोव्यात सध्या तारांकित हॉटेलांव्यतिरिक्त नवीन हॉटेल साखळी प्रवेश करू पाहत आहेत.
याचा अर्थ, गोव्यातील पर्यटन कमी होणारे नाही पण त्याला वळण देणे आवश्यक आहे, हेच आहे. येती काही वर्षे गोवा पर्यटकांचे आवडते ठिकाण असेल यात शंका नाही पण ‘क्वालिटी ओव्हर क्वांटिटी’ ही फक्त घोषणाच राहता कामा नये.
चांगल्या भविष्याकडे लक्ष केन्द्रित करायचे असेल तर पर्यटकांची घटती संख्या हे गोव्यासाठी वरदानच आहे. गोव्याच्या पर्यटनाच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची ही सुरुवात असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.