

या महिन्यात १२ वर्षाच्या मुलाने परीक्षेत गुण कमी मिळतील या भीतीने मृत्यूला कवटाळले. गेल्या महिन्यातही आपण, दडपणाखाली असलेले एक शाळकरी मूल असेच गमावले. सुज्ञ पालक, शिक्षक, शालेय प्रशासन आणि एकूणच मुलांशी जोडलेले समाजातील इतर घटक या सर्वांना विश्वासात घेऊन या समस्येचे सूक्ष्म विश्लेषण होणे अत्यावश्यक आहे.
ही कारणमीमांसा वारंवार करण्या मागचा हेतू हा अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस, प्रभावी आणि संवेदनशील उपाययोजना उभ्या करणे हा आहे. मुलांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या भावनिक गरजा ओळखणे आणि त्यांना सुरक्षित-स्थिर वातावरण देणे ही सुजाण समाजाची जबाबदारी आहे. त्यासाठी काही मुद्दे इथे विचारमंथनासाठी मांडते; त्या मुलांशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्याव्या आणि योग्य कृती आकारास यावी ही तीव्र इच्छा आणि तळमळ आहे.
मुलांची शैक्षणिक क्षमता: ज्या मुलांना शाळेत शिकवलेले सहज समजते, त्यात त्यांची आवड निर्माण झाली, की ते त्या दिशेने स्वयंस्फूर्तीने आणि मनापासून मेहनत करू लागतात. यात त्यांच्या बुद्ध्यंकासोबत त्यांची आकलनशक्तीही महत्त्वाची ठरते. मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले, तर त्यांच्या रुचीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढ होत जाते. एखाद्या मुलाची क्षमता साधारण असताना, त्याच्याकडून सर्वसाधारण पातळीपेक्षा अधिक गुण मिळवण्याची अपेक्षा ठेवली, तर ते मूल मानसिक दडपणाखाली येते.
परिणामी, अभ्यासावर विपरीत परिणाम होतो आणि जास्तीत जास्त प्रयत्न करूनही अपेक्षित कामगिरी होत नाही. मुलांना योग्य पद्धतीने प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात साथ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मुलांनी मिळवलेले गुण हा गौरव किंवा लाज याचा विषय बनवणे हे समीकरण नकारात्मक आणि अपायकारकच ठरते.
आभासी जगाशी सलगी: मोबाइल क्रांती झाली आणि संपूर्ण जग माहिती तंत्रज्ञानाच्या रूपाने आपल्या तळहातावर आले. याचे फायदे तोटे समजावण्याआधी आम्ही ही दुधारी तलवार लहान थोरांच्या हाती सोपवली. आता त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला लागले आहेत. गेमिंग अॅप्स, सामाजिक माध्यमावरील रंगीत रिझवणाऱ्या खऱ्या खोट्या कथा ह्यांच्याकडे जुळलेली अवास्तव जवळीक गळ्याशी येऊ लागली आहे. या जाळ्यात अडकलेल्या मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता कमी होत आहे हे पुराव्यानिशी मानसशास्त्रातले शोधनिबंध सांगतात. सगळ्याच गोष्टींकडे आभासी खिडकीतून पाहताना नेटवर्कच्या जाळ्यात त्यांच्या भावना गुरफटतात.
फसवी गोपनीयता त्यांना खेचून घेते, अनोळखी जग त्यांना जवळचे, सुरक्षिततेचे भासू लागते. अभ्यासात अधोगती दिसू लागली, की घरात वादविवाद वाढत जातात. निर्ढावलेले पाल्य आणि हतबल पालक अशी हमरीतुमरी माजते.
बालपणाचा उंबरठा ओलांडून जेव्हा मुलं किशोरावस्थेत पदार्पण करतात तेव्हा त्यांचे मन थोडे हळवे झालेले असते. शारीरिक बदलांचे पडसाद भावनिक जगतात जाणवायला लागतात. नेमके हेच वय अभ्यासात झोकून देण्याचे, करिअर निवडण्याचेही असते. विकासात्मक मानसशास्त्रज्ञ डेविड एल्किंड मुलांच्या संज्ञानात्मक विकासावर प्रकाश टाकतात या वयात मुलं अति आत्मकेंद्रित होतात हे त्यांनी ‘इमॅजिनरी ऑडियन्स’ आणि ‘पर्सनल फॅबल’ या संकल्पनांच्या आधारे स्पष्ट केले आहे.
आपण काहीतरी वेगळे आहोत, आपलं म्हणणं इतरांना समजणार नाही किंवा इतर लोक सतत आपलं निरीक्षण करत आहेत, आपले मूल्यांकन करत आहेत असा त्यांचा समज असतो. ज्यामुळे स्वभाव थोडा बुजरा होतो किंवा अति स्वैर होतो. सामाजिक भीती मनात घर करून बसते, स्वतःवर सतत टीका करणे, स्वतःमध्ये अति गुंतून राहणे या गोष्टी होतात. अशावेळी त्यांच्यावर झालेले आरोप, टीका किंवा एखादा लैंगिक शोषणासारखा भावनिक धक्का किंवा सतत येणारे अपयश, कुटुंबातील ताणतणावाचे वातावरण अशा समस्यांना कायमस्वरूपी लागलेला डाग समजून आत्मघातासारख्या पळवाटा ते अविचाराने जवळ करण्याचा धोका संभवतो.
या सगळ्या समस्यांना तोंड द्यायला लागतो तो एक भक्कम आधार. टीका न करता आपल्या भावना समजून घेणारी आणि मार्गदर्शन करणारी एक व्यक्ती. ही गरज जाणून अनेक बिगरसरकारी संस्थांनी गोव्यात समुपदेशनाचे काम सुरू केले आज या समस्येची दखल सरकार दरबारी घेतली गेली आहे. फक्त त्यात अजून भर पडून खऱ्या अर्थाने ही योजना मार्गास लावणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री समुपदेशन योजना ही गोवा सरकारची विद्यार्थ्यांसाठी मानसिक-आरोग्य आणि समुपदेशन सेवा देणारी नवी सुधारित योजना आहे. ही योजना ‘गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’मार्फत राबवली जाते आणि शिक्षण खात्याच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित आहे.
या योजनेअंतर्गत १५० समुपदेशक आणि २५ पर्यवेक्षक यांची नेमणूक सरकारी आणि अनुदानित माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळांमधून करण्यात आली आहे. शिक्षण जगतातील आव्हाने, मुलांच्या वाढत्या मानसिक समस्या यांचा विचार करता गोव्यातील विद्यार्थी आणि समुपदेशक हे गुणोत्तर यात सुधारणा होणे अपेक्षित आहे.
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम अखंडितपणे चालू राहणे अत्यावश्यक आहे. हतबल झाल्यासारखे वाटणे ही मानवी भावना आहे; अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर अनेकदा जीवितहानी टाळता येऊ शकते. भारत सरकारची ‘टेली-मानस’ ही २४ तासांची विनाशुल्क हेल्पलाईन (१४४१६) सतत उपलब्ध असून, या क्रमांकावर कुणीही आपल्या समस्यांबद्दल मनमोकळेपणाने बोलू शकतो.
येथे संपूर्ण गोपनीयता राखली जाते, हे विशेष. गोव्यातील ‘कूज’ (COOJ) या बिगरसरकारी संस्थेची डिस्ट्रेस हेल्पलाईनदेखील उपलब्ध आहे. ६३६१६१२५२५ या क्रमांकावर दुपारी एक ते संध्याकाळी सात या वेळेत संपर्क साधता येतो. या दोन्ही सेवा विनाशुल्क असून तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळते. जीवनातल्या चढउतारांना सामोरे जाताना अनेकदा पाऊल डगमगते, मानसिक थकवा जाणवतो, काहीच नको असे वाटायला लागते.
आपल्या मानसिक आरोग्याची (Health) काळजी नियमित घेण्याची सवय आपण मुलांना लावली, आपल्या समस्या मनमोकळेपणे सांगण्याची सवय लावली तर ती वेळीच मदतीसाठी हाक देतील. त्याचबरोबर मुलांना अपेक्षेपलीकडील नि:स्वार्थ प्रेम देणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी . भीती, ताणतणाव व्यवस्थापन, अपयश हाताळणे हे विषय बालक-पालक प्रबोधनात येणे गरजेचे आहे. आत्मघात हा तात्पुरत्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा समजण्याचा अविचार काही क्षण आपला पिच्छा पुरवतो.
नेमका तोच क्षण, दूर सारता आला की समस्येला तोंड देण्यासाठीचे इतर पर्याय सुचत जातात ही गोष्ट ठामपणे मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. पालक, शिक्षक व एकूणच समाज मिळून एक अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे जी अशा कठीण, निर्णायक क्षणी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मुलांसाठी सुरक्षित, स्थिर व पोषक वातावरण निर्माण करणे अपरिहार्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.