

कोणत्याही भूभागावर जेव्हा परकीय सत्ता राज्य करते तेव्हा तिथे त्या सत्तेच्या मातृभाषेतून शिक्षण सुरू केले जाते. जसे १९४७पूर्वी काही भाग वगळता उर्वरित भारतात इंग्रजी माध्यम होते तर गोवा प्रदेशात पोर्तुगीज माध्यम होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीज नियंत्रणातून मुक्त झाला आणि या मुक्त देशात स्वभाषेतून शिक्षण दिले घेतले जाऊ लागले. जसे की महाराष्ट्रात मराठी, गुजरात राज्यात गुजराती, कर्नाटकात कन्नड भाषेत शिक्षण होऊ लागले.
गोवा राज्यात १९६२साली स्वायत्त सरकार स्थापन झाले. त्या पाहिल्या सरकारने भराभर मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू केल्या. हायस्कूल शिक्षण मात्र बहुतांशी इंग्रजी माध्यमातून होऊ लागले. मराठी माध्यमाची हायस्कूल इथे फारच कमी होती. मराठी माध्यमातून शिकलेली मुले जागतिक स्पर्धेत मागे पडतील असा समज बहुतांशी पालकांचा झाला आणि आपल्या पाल्यांना त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले
मात्र, पणजी येथील कस्तुरबा हायस्कूल हे त्यावेळी मराठी माध्यमातून चालत असे. सु. स. खानोलकर हे या शाळेचे मुख्याध्यापक होते. या शाळेतून अकरावीपर्यंत शिकून तयार झालेले अनेक विद्यार्थी पुढे जाऊन अनेक क्षेत्रात चमकले.. मिश्किल लेखक दिलीप बोरकर आणि गोवा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक नंदकुमार कामत हे याच शाळेतून शिकले.
कोकणीत लिहिणारे सुप्रसिद्ध नाट्य लेखक पुंडलिक नाईक हे सावईवेरे येथील सरकारी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेले आहेत. मराठीतील साहित्यिक आणि शिक्षक एन. शिवदास यांचे शिक्षक प्रशिक्षण पर्वरी येथील सरकारी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून मराठी माध्यमातून झालेले आहे. मराठीसारख्या समृद्ध भाषेत शिकून तयार झालेली ही मंडळी मराठी व कोकणी भाषेतून फार छान साहित्य निर्मिती करतात. डॉ. नंदकुमार कामत हे मराठीत आणि इंग्रजीत उत्तम लेखन करतात.
गोव्यातील सरकारी मराठी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी मला माहीत आहेत जे पुढे जाऊन अनेक महत्त्वाच्या पदांवर गेले आणि त्यांनी आपले नाव उज्ज्वल केले. त्यात आनंद नाईक, हे गोवा लेखा खात्यातून उपसंचालक पदावरून निवृत्त झाले, सुरेश उगवेकर स्टेट बँकेमधून उच्च अधिकारी म्हणून वावरले. श्यामसुंदर आसोलकर हे राज्य सहकारी बँकेत उच्च पदावरून निवृत्त झाले.
मधुकर गवंडी हे सहायक लेखाधिकारी म्हणून निवृत्त झाले, दशरथ परब हे पोलीस अधिकारी पदावरून निवृत्त झाले, किशोर भावे हे गोवा कृषी खात्यात उपसंचालक होते, अदिती बर्वे ही एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापक झाली आहे, दया जोशी आणि नीता भावे या सरकारी हायस्कूलमध्ये उत्तम शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. प्रा. नारायण महाले हे उत्कृष्ट ग्रामीण कथाकार म्हणून सध्या गाजत आहेत. सुनंदा सामंत ही उत्तम नर्स म्हणून निवृत्त झाली. भारती सामंत ही महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात चांगल्या पदावर होती. एकनाथ महाले हा विद्यार्थी उत्तम चित्रकार आणि कल्पक नाट्य दिग्दर्शक झाला. हे सर्व विद्यार्थी पेडणे आणि सत्तरीसारख्या मागास समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत हे विशेष!
या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेताना कुठलीही अडचण आलेली नाही. आजचे गोव्यातील आघाडीचे नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत शेट्ये हे वझरी येथील मराठी शाळेतून दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकले आहेत त्यांना इंग्रजी माध्यमातील वैद्यकीय शिक्षण घेताना कोणतीही अडचण आली नाही. जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर हे अकरावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकले आणि वैज्ञानिक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. याचा अर्थ असा की, माध्यम मराठी असले तरी कुशाग्र बुद्धीची मुले आपले ध्येय गाठतात. मराठी माध्यमातून शिकलेली मुले स्पर्धेत मागे पडतात हा पालकांचा गैरसमज आहे.
गोवा हा कलाकारांचा प्रदेश आहे. संगीत, नाटक हे इथल्या प्रत्येकाच्या रक्तात भिनलेले आहे. हिंदू समाजाच्या धार्मिक उत्सवात ज्या आरत्या, भजने, कीर्तने होतात ती मराठी भाषेतूनच होतात. मराठी हा इथल्या संस्कृतीचा स्थायिभाव आहे आणि म्हणूनच किमान प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून व्हावे ही गरज आहे. कोणत्याही मराठी माध्यमाच्या शाळांमधून एक उत्तम इंग्रजी जाणणार शिक्षक नेमला गेला तर मुलांना इंग्रजी विषयाची भीती वाटणार नाही आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेताना किंवा नोकरी / व्यवसायात शिरताना इंग्रजीची जी भिती त्यांना वाटते ती वाटणार नाही.
ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या हायस्कूल शिक्षणाची गरज ओळखून गोवा सरकारने १९६७साली गोव्यातील ग्रामीण भागात मराठी माध्यमाची दहा हायस्कूल प्रथम सुरू केली. कालांतराने पालकांच्या आग्रहास्तव या शाळा पुढे इंग्रजी माध्यमांकडे वळल्या. परिणामी मराठी माध्यमाचे वर्ग हळूहळू रोडावत गेले आणि इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देण्यात आले. गोवा मुक्त होण्यापूर्वी ज्या शाळा खाजगी संस्थांमार्फत चालत असत त्यांना सरकारने अनुदान देण्यास सुरुवात केली.
अनुदान मिळते हे पाहून गोव्यात अनेक ठिकाणच्या छोट्या मोठ्या राजकीय नेत्यांनी शिक्षणसंस्था उभारल्या. आज त्यांची संख्या ३५० एवढी झाली आहे. पूर्वी एका गावात एकच हायस्कूल असायचे त्या ठिकाणी आता चार चार हायस्कूल उभी राहिली आहेत. आज ९ सरकारी उच्च माध्यमिक आणि १०८ खाजगी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू आहेत आणि ती सर्व इंग्रजी माध्यमातून सुरू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.