
विवेक कामत
या वर्षी गांधीजयंती, दसरा, संघाला शंभर वर्षे पूर्ण होणे हा भद्र योग ०२ ऑक्टोबर रोजी जुळून आला खरा, पण ‘सोशल मीडिया’ नामक गलिच्छ सार्वजनिक संडासात या दिवसाचे वाट्टोळे अभद्र पद्धतीने साजरे झाले. झुंडशाहीस ऊत आला होता. कोण किती नीच पातळी गाठतो याची स्पर्धाच लागली होती.
गांधी व संघ यांचे विचार, कृती कितीही न पटो, आपले ‘न पटणे’ व्यक्त करायला मर्यादा असतात. ‘त्याने असे लिहिले? मग मी त्याहीपेक्षा खाली जाऊन त्याला ट्रोल करेन’, ही मानसिकता सर्वत्र दिसते.
या निमित्ताने संघाचा स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग, सावरकरांचे माफीनामे, सावरकरांनीच गोडसेच्या हातून गांधींना मारले, सावरकर हे संघी, नोटेवर गांधी; चिल्लर नाण्यांवर संघ, संघ ही दहशतवादी संघटना, संघाने ब्रिटिशांना मदत केली अशी चित्रे, व्यंगचित्रे पोस्ट केली जात होती.
दुसऱ्या बाजूने गांधींचे सत्याचे प्रयोग, हिंदू स्त्रियांना मुसलमानांनी बलात्कार केले, कापून काढले तरी सहन करण्याची सूचना, गांधींची केवळ हिंदूंसाठी असलेली अहिंसा, गांधींचे मुस्लीम तुष्टीकरण, गांधी गरीब राहावेत म्हणून कॉंग्रेसला करावा लागणारा प्रचंड खर्च याची चर्चा.
याशिवाय, फाळणीला जबाबदार कोण, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कुणी मांडला, नेहरू कसे विलासी होते, नेहरू-एडविना प्रेमसंबंध हे वार्षिक विषय येतच होते.
रावण हा बहुजनांचा देव, त्याला आर्य भटांनी त्याच्या भावाला फितुर करून कपटाने मारले. विजयादशमी हा काळा दिवस. या दिवशी रावणाला जाळायचे सोडून रामाला जाळा. तामिळनाडून दसऱ्याला रामाचे प्रतिमादहन झाले.
विचारधारेचा विरोध अविचाराने करण्याची ही स्पर्धा निश्चितच आम्ही ‘मागास’ असल्याचेच द्योतक आहे. स्मशानात वाढदिवस साजरे करणे, यासारखे आचरट प्रकार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावे होत असतात.
हाच तर्क लावायचा तर प्रेताला पाळण्यात ठेवून ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ म्हणत बारसे करायचे का? आपली संस्कृती हीन करण्यासाठी किती खुळचट आटापिटा करायचा याला काही मर्यादा हवी.
ज्या जागी जे करणे योग्य आहे, उचित आहे ते करावे. ते करण्याची प्रथा आहे, म्हणून त्याला विरोध करायचा. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याकडे संस्कार होत असतात. स्मशानात जे करतात त्यालाही प्रेतसंस्कार म्हणतात.
पण, कर्मकांडे, विधी यांना विरोध करायचा म्हणून हे सगळे केले जाते. कशालाही ‘प्रथा’ म्हटले जाते. विधवा होणे ही प्रथा कशी असू शकते, हा प्रश्न एकाही पुरोगामी फेमिनिस्टांना पडत नाही. विधवेला दिली जाणारी वागणूक, तिची होणारी छळणूक हे घरगुती हिंसा कायद्याखाली येते.
तरी त्यासाठी वेगळा कायदा, नियम हवेत. कारण, बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे हा स्त्रीवर अन्याय आहे व ती तथाकथित ‘विधवा प्रथा’ आहे. ब्रेक-अप सेलेब्रेट केला जातो, तसे विधवा होणे सेलेब्रेट करायचे का त्या महिलेने?
स्वातंत्र्यासाठी लढलेला प्रत्येक महापुरुष प्रत्येक भारतीयाला वंदनीयच असला पाहिजे. आपल्या विचारधारेचा नाही, आपल्या राजकीय पक्षाच्या विचारप्रक्रियेशी जुळणारा नाही म्हणून त्याचे सोशल मीडियावर कपडे उतरवायचे का?
नीट विचार करून पाहा. झुंडशाहीत सहभागी होऊन आम्ही आमच्याच महापुरुषांचे कपडे उतरवत आहोत. गांधी आणि सावरकर यांना आम्ही जगासमोर गलिच्छ, वाईट, नासके ठरवत आहोत. जे ब्रिटिशांना करता आले नाही, ते आम्ही करत आहोत. स्वत:च्या स्वातंत्र्यसैनिकांची अशी विटंबना कुठल्याच देशातले लोक करत नसतील.
स्वातंत्र्यसैनिक, संस्था आणि संस्कृती यांना हीन ठरवून आपल्याला काय मिळते? आपलेच लोक किती वाईट, आपल्याच संस्था कशा देशद्रोही आणि आपलीच संस्कृती कशी हीन हे स्वत:चे पैसे खर्च करून जगाला ओरडून सांगण्याचा धंदा आपण सोशल मीडिया नामक मायाजालाच्या साहाय्याने करत
आहोत. संस्कृतीच्या सगळ्या मानबिंदूंना शोषक-शोषित या बायनरीमध्ये ढकलायचे आणि वर्गसंघर्ष पेटवत ठेवायचा, हे काम इमातेइतबारे विचारवंत करत आहेत. दोन्ही बाजूंना मुद्देही तेच पुरवतात आणि युद्धेही तेच करवतात. ज्याची बाजू कमजोर असेल त्याच्या बाजूने उभे राहतात. त्यामुळे, दरवर्षी तेच मुद्दे, तीच युद्धे. आपण लोक म्हणून त्यात किती पडायचे, हे ठरवावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.