
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी महाराजांनी धर्मांतरण रोखल्याचे विधान शिवजयंतीच्या निमित्ताने केले; त्यात चुकीचे काहीच नाही. पण, ख्रिस्तीकरण रोखण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कुंकळ्ळी येथे झाला होता, याचे स्मरणही सर्व गोमंतकीयांनी ठेवले पाहिजे.
पोर्तुगीजांनी सासष्टी काबीज केली तेव्हा कुंकळ्ळी, असोळणे, वेरोडा, चिचोळणे आदी गावे त्यांच्या वर्चस्वाखाली आली. ‘भिवसा’ या गावातील महादेव मंदिर उद्ध्वस्त करून तेथील काही लोकांचे ख्रिस्तीकरण करण्यात आले.
ख्रिस्ती मिशनरि व पोर्तुगीज अधिकारी अनेक वेळा या गावांवर चालून आले. त्यांनी अनेकांची हत्या केली, देवळे मोडली. ग्रामस्थांनीही अनेकदा त्यांचा यशस्वी प्रतिकार केला व मोडलेली देवळे पुन्हा बांधली.
१५ जुलै १५८३ या दिवशी पाच पाद्री, एक पोर्तुगीज अधिकारी आणि १४ नवख्रिस्ती कुंकळ्ळी गावांमध्ये चर्च बांधण्यासाठी जागा शोधू लागले. एका पाद्र्याने एका गाभण गाईला मारून तिचे प्रेत जवळच्या तळ्यात फेकले. या घटनेने ग्रामस्थ संतप्त होऊन पेटून उठले. हाती मिळतील ती हत्यारे घेऊन पाचही पाद्री व त्यांच्याबरोबर आलेल्यांना कापून काढले.
गोव्याच्या इतिहासातील पोर्तुगीजांविरुद्धचे हे पहिले यशस्वी बंड होते. ज्यांनी आमच्या धर्म, संस्कृती व श्रद्धास्थानांवर घाला घातला, त्या दुष्ट सैतानांच्या रक्ताने देवी शांतादुर्गेला घातलेल्या अभिषेकाची ही विजयगाथा आजही कुंकळ्ळीचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. पोर्तुगीजांचे जुलूम व धर्मप्रचारकांचे धार्मिक अत्याचार यांच्याविरुद्धचे हे पहिले मोठे बंड.
त्यानंतरही सूडापोटी पोर्तुगिजांचे हल्ले या गावांवर सुरूच होते. या नेहमीच्या जाचाला कंटाळून गावातील म्होरक्यांनी पोर्तुगीजांशी युद्ध-विराम-संधी करायचे ठरवले. १६ ग्रामप्रमुख असोळणा किल्ल्यावर बोलणी करण्यासाठी नि:शस्त्र गेले.
परंतु पोर्तुगिजांनी विश्वासघाताने त्यांना किल्ल्यामध्ये बंदिवान बनवून अमानुष छळ करून त्यांची हत्या केली. त्यातील फक्त एक जण तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाला. कुंकळ्ळीतील आमच्या पूर्वजांनी त्यानंतरही धर्मांतरणाविरुद्ध लढा सुरूच ठेवला.
हिंदू देवालयांचा विद्ध्वंस व सक्तीचे ख्रिस्तीकरण करण्यामुळे जे पाच ख्रिस्ती पाद्री मारले गेले, त्यांना नंतरच्या काळात चर्चने संतपद बहाल करून गौरविले. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज शासनाने या सर्व तथाकथित संतांचे स्मारकसुद्धा बांधले.
पण, या धर्मांतरणाविरुद्ध लढताना कुंकळ्ळीच्या ज्या ग्रामप्रमुखांनी खरेखुरे हौतात्म्य पत्करले होते, त्यांचे स्मारक उभे राहण्यासाठी मात्र १९९९ साल उजाडावे लागले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळातच कुंकळ्ळीच्या हुतात्म्यांचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. हा कुंकळ्ळीच्या ग्रामस्थांनी रोखलेल्या धर्मांतरणाचा धडा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील!
(लेखक गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष आहेत.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.