

मधू य.ना.गावकर
आज इंग्लड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, अमेरिका देशांत चतुर्थीला श्री गणेशाचे पूजन करून त्या मातीच्या रूपाला पर्यावरणीय नजरेने पाहिले जाते. जाणती माणसे राम कृष्णाच्या गोष्टी लहान मुलांना सांगताना त्यात गणपतीचा महिमा सांगतात.
पृथ्वीवर मानव प्राण्याने जन्मापासून सृष्टीची रुपे बदलण्यासाठी अहंकारी प्रयत्न चालवलेला दिसतो. मानवाने मातीला पूजण्याची सुरुवात करून तो शेतीकडे वळला. तसेच गणेशपूजनाकडेही वळला. श्रावणातील नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि अष्टमी पूजनाने धान्य रक्षणासाठी सरपटणारा साप, खवळलेला समुद्र आणि गाई गुरांचे रक्षण करणारा मानवी अवतारातील कृष्ण म्हणजे पाणी देणारे ढग यांना प्रसन्न करून घेण्यास त्यांना दैवत्व बहाल केले.
ज्या भूमीवर त्याने आपल्याला लागणारे धान्य पीक घेतले त्या चिखलमातीचा गोळा करून त्याला मानवी देहाचा आकार दिला, पेरलेल्या दाण्याला उगवण्यासाठी हत्तीची ताकद लागल्याने त्या मृतिकेच्या मूर्तीला आपल्या बुध्दी कौशल्याने हत्तीचे सोंड लावून भाद्रपदात पिकणारे धान्य उंदरांनी नष्ट करू नये म्हणून उंदिराची प्रतिमा बनवून त्यावर गणपती विराजमान केला. माणूस त्याला पुराणाचा शास्त्रोक्त आधार देऊन त्या मातीच्या मूर्तीला श्री गणेशाचे नाव देऊन पूजन करू लागला. लंबोदर वक्रतुंड, विघ्नहर्ता, विनायक, महाकाय, गजानन, वरद, अशा कैक नावांनी त्याची भाविक आराधना करतात. लोकमान्य टिळकांनी गणेशचतुर्थी उत्सव सार्वजनिक करून भारतीय जनतेत एकोपा निर्माण केला.
त्या बळाने ब्रिटिशांना भारत सोडून स्वदेशात जावे लागले. चतुर्थी उत्सव जरी आज कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात दीड, पाच, सात,नऊ, अकरा आणि एकवीस दिवस साजरा होत असला, तरी त्याची ख्याती जगभरात पसरली आहे. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, म्यानमार, चीन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान देशातही श्री गणेशाच्या मूर्ती आहे, आज इंग्लड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, अमेरिका देशांत चतुर्थीला श्री गणेशाचे पूजन करून त्या मातीच्या रूपाला पर्यावरणीय नजरेने पाहिले जाते. जाणती माणसे राम कृष्णाच्या गोष्टी लहान मुलांना सांगताना त्यात गणपतीचा महिमा सांगतात.
श्री गणेशाची आराधना करत माणसाने आपला विकास साधला. पूर्वी माणूस झाडाच्या साली, पाने, झावळे अंग झाकण्यास वापरत होता. त्याने प्रगत होत ओंडका,गाडी, सायकल, मोटार, विमान, धातू, वस्त्र, अलंकार शस्त्रे स्फोटके, दारुगोळा अशी शस्त्रे तयार करून सृष्टीला शह देत स्वतःसह इतरांनाही नष्ट करण्यासाठी झटू लागला आहे. मानवी आत्मघाताच्या वृत्तीमुळे जपानमधील हिरोशिमा नागासाकी संहार, भोपाळ दुर्घटना, गाझापट्टी संहार,जर्मनीतील हत्याकांड, जालियनवाला हत्याकांड तसेच किल्लारी भूकंप, इंडोनेशिया सुनामी, नेपाळ, भूकंप, हिमनद्यांचे पूर, केरळचा वायनाड पूर असे निसर्ग निर्मित अघटीत घडले.
असुरी लालसा बाळगणारा सुशिक्षित अगर अशिक्षित मानव कळत नकळत या पृथ्वीला वाचवण्यासाठी निर्माण केलेली पंचतत्वे पाणी, हवा, प्रकाश, आकाश आणि भूमीचे सौंदर्य नष्ट करतो. याचे कारण गेल्या दोन शतकांपासून त्याने पृथ्वीच्या पोटातून खनिजांसह विषारी रसायनांचा उपसा केल्याने पृथ्वीला सुरक्षित ठेवणाऱ्या तत्वांत घातक रसायने मिसळतात. त्याने सूर्याची किरणे अतिनील बनतात, पाऊस देणारे वृक्ष कापणे, डोंगर पर्वत तोडफोड करणे, त्याने मानवजात आणि जैविक संपदेला जाणीवपूर्वक धोका पोहचतो.
आज चतुर्थी दोन दिवसांवर आहे. पुढे दसरा, दिवाळी, जत्रा, कालोत्सव, शिगमा येईल, त्या आनंदाने मानव उत्सवासाठी घरी येताना फुलबाजी, फटाके अशा वस्तू घरी आणून मुलांकडे देतात. ती घरासमोर, रस्त्यांवर, ओहळ, तलाव, विहीर, नदी काठावर पेटवून आतषबाजी करतात. त्यामुळे हवा मानवी जीवितासाठी दूषित बनते. गणपतीच्या अंगावरील निर्माल्य आणि प्लास्टिक पाण्यात टाकल्याने स्वच्छ पाणी प्रदूषित बनल्याने मस्यसंपदा मरून जाते. त्याचा वाईट परिणाम भातपीकावरही होतो. म्हणून प्रत्येकाने या वसुंधरेच्या जतनासाठी झटले पाहिजे, यंदा फोंडा शहरातील पर्यावरणवादी, पत्रकार आणि विचारवंत यांनी एकत्र येऊन महाविद्यालये, उच्चमाध्यमिक आणि विद्यालयीन मुलांसाठी गणपती विसर्जन कसे करावे या विषयावर स्पर्धा ठेवून लोक जागृतीचा संदेश दिला आहे.