

मिलिंद म्हाडगुत
भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन नुकतेच गोव्यात येऊन गेले. गोव्यात त्यांनी आमदार-मंत्र्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली. भाजपचे एक बरे असते ते नेहमीच नियोजनपूर्वक काम करत असतात. परिस्थितीप्रमाणे रणनीती आखत असतात आणि याचाच प्रत्यय नवीन यांच्या भाषणातून आला.
भाजपची आणखी एक खासियत म्हणजे त्यांच्या यशाला सीमारेषा नसते. अधिकाधिक यश मिळविण्याकरता ते नेहमीच प्रयत्नशील असतात. यावेळी तरी विरोधक एकत्र येतात की काय हे सांगणे सध्या कठीण असले तरी तशी शक्यता गृहीत धरून भाजपने आतापासूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे एवढे खरे.
आज राज्यात अनेक समस्या भाजपसमोर ‘आ’ वासून उभ्या आहेत. ठिकठिकाणी अनेक आंदोलने होत आहेत. ‘इनफ इज इनफ’ या शीर्षकाखाली निवृत्त न्यायमूर्ती फर्दीन रिबेलोंच्या नेतृत्वाखाली बुद्धिवाद्यांची चळवळ उभी राहत आहे.
या कोंडीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न भाजपला या वर्षात करावा लागणार आहे. त्यांची जमेची बाजू म्हणजे दुबळा विरोधी पक्ष; खास करून कॉंग्रेस. कॉंग्रेस सध्या ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ बघण्यात दंग आहे. त्यांना वस्तुस्थितीची जाण आहे असे बिलकूल वाटत नाही.
याउलट भाजप ‘सपने’ बघण्यापेक्षा ‘फिल्ड’वर उतरण्याचे बघत आहे. फोंडा मतदारसंघात आणखी काही दिवसांनी पोटनिवडणूक होणार आहे. बऱ्याच घटकांनी दिवंगत मंत्री रवि नाईक यांचे पुत्र रितेश यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
पण म्हणून ही उमेदवारी रितेशना मिळेलच असे सांगता येत नाही. सध्या त्यांचा फोंड्यात खाजगी सर्वे सुरू आहे आणि या सर्वेप्रमाणेच ते निर्णय घेतील हेही तेवढेच खरे आहे.
या उलट कॉंग्रेसची परिस्थिती आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे परवा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फोंडा मतदारसंघातील कॉंग्रेस नेतृत्व सक्षम असून येणारी पोटनिवडणूक कॉंग्रेसच जिंकणार असा विश्वास प्रगट करतात.
पण हा विश्वास व्यक्त करताना नुकत्याच पार पडलेल्या झेडपी निवडणुकीत कुर्टी मतदारसंघात कॉंग्रेसचा धुव्वा का उडाला, याची कारणमीमांसा करण्याची तसदी ते घेत नाहीत. ‘गिरे तो भी टांग उपर’ तशातला हा प्रकार.
बूथ बांधणी करणे हा प्रकार कॉंग्रेसच्या शब्दकोषात आहे असे कधी दिसलेच नाही. या उलट परवा भाजप संघटना ही बूथ अध्यक्षांच्या जोरावर उभी आहे असे सांगून नवीन यांनी बूथ अध्यक्षांचे महत्त्व अधोरेखित करून टाकले. आणि ते खरेही आहे.
भाजपमध्ये बूथ अध्यक्षांना तशा प्रकारचा मानही मिळत असतो. म्हणूनच ही संघटना गोव्यात तळागाळात पोहोचू शकली. वास्तविक गोव्याचे राजकीय वातावरण भाजपला पूरक आहे असे नाही. सासष्टी तालुका हा अजूनही भाजपच्या विरोधात आहे. राज्यातील अल्पसंख्याक जमातही भाजपला विशेष अनुकूल आहे असे कधीही दिसले नाही. पण असे असूनसुद्धा ते राज्य करू शकतात ते केवळ संघटन चातुर्याच्या जोरावर. नावेली मतदारसंघाचे उदाहरण घ्या. सासष्टी तालुक्यातील
हा मतदारसंघ भाजपला पूरक असा कधीच नव्हता. पण तरीही तिथे भाजपची स्वतःची अशी मते आहेत. ती जिंकण्याला पुरेशी नाही हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. पण विरोधकांची मते फुटल्यामुळे आणि भाजपची मते एकसंध राहिल्यामुळे गेल्या निवडणुकीत भाजपचा विजय होऊ शकला.
विरोधकांनी खास करून कॉंग्रेसने यापासून बोध घ्यायला हवा. आता पक्षाध्यक्ष आले, निवडणुका जवळ यायला लागल्या की भाजपचे अनेक केंद्रीय पदाधिकारी, मंत्री गोव्यात डेरा घालायला लागतील.
अगदी गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान मोदीसुद्धा याबाबतीत मागे राहणार नाहीत. ‘रात्र वैऱ्याची आहे जागा राहा ‘या उक्तीप्रमाणे काम करण्याची पद्धतच भाजपच्या कामी आली आहे आणि येत आहे. म्हणूनच तर प्रशासनात त्रुटी असूनसुद्धा भाजप राज्यात बाजी मारताना दिसतो.
कॉंग्रेस मात्र फक्त हवेतच तीर मारताना दिसते. आता विधानसभा निवडणुकीला जेमतेम ११ महिनेच राहिले आहेत. फक्त कल्पनेचे पूल बांधत राहिले तर गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटल्याप्रमाणे आगामी निवडणुकीत भाजप २७ जागा घेऊन जाईल आणि विरोधकांच्या हाती, हात चोळण्याशिवाय दुसरे काहीही राहणार नाही एवढे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.