

मधू य.ना. गावकर
शेकडो वर्षे चालत आलेली ही आषाढी एकादशीची वारी जशी सफेद आणि भगव्या गुढ्यांनी पंढरपुरातील चंद्रभागेचा परिसर फुलवते, तसाच या महिन्यात निसर्ग बहरतो. गुढी उभारून नाचत विठ्ठलाच्या दारात पोहचून त्याचे प्रेमभराने दर्शन घेताना, गळ्यात दिसणारी तुळशीमाळ, कपाळीचा चंदन टिळा, कासे पितांबर नेसलेला विठ्ठल पाहून चैतन्याचा दिवा पाहिल्याचा भास होतो.
आषाढी एकादशी म्हटली, की वारकरी संप्रदायाला पंढरीच्या विठ्ठलाची ओढ लागते. जून महिन्यात पाऊस सुरू होताच शेतकरी पेरणी करून त्या पेरणीचा भार विठ्ठलावर सोडून तो वारीचे व्रत पाळून पायी चालत विठ्ठलाच्या भक्तीत रमून ज्ञानेश्वर तुकारामाचा गजर करीत पंधरा वीस दिवसांत पंढरपुरात पोहचतो. चंद्रभागेत स्नान करून प्रथम भेट पुंडलिकाची घेऊन त्या नंतर देवळाची पायरी चढताना नामदेवाचे दर्शन घेतो.
नंतर विटेवर उभ्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन पंढरीची वारी केल्याचे समाधान मानतो. वारीत चालताना तो तंबोरा, पखवाज, टाळ, मृंदगाच्या नादात आपला स्वर मिसळून ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई अशा संताच्या नावाने विठ्ठलाला हाक मारत भक्तीत रमतो.
आमच्या इवल्याशा गोव्यात आणि कोकण किनारपट्टीत पावसाची हजेरी असते, यंदाच्या वारीपूर्वी महाराष्ट्रातील पुणे, सातारा, जिल्ह्यात पाऊस पडून देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीने तिथल्या प्रशासनाच्या भरवशांवर न राहता पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरून वारकऱ्यांसाठी स्वतःच स्वच्छ होऊन नितळ पाण्याने वाहू लागली. यातूनच सिध्द होते की, निसर्गाला मानवाची चिंता आहे, पण मानवाला निसर्गाची चिंता नाही.
वारकऱ्यांच्या दिंड्या प्रयाण करताना संपूर्ण दिवस ऊन झेलीत प्रवास करीत असतात. त्यांच्या अंगावरून घामाचे लोट वाहतात, जमीन तापल्याने पायाला फोड येतात, दिवसभर चालून त्यांचे पाय सुजतात, पण त्या सावळ्या पांडुरंगाच्या भेटीच्या आशेने ते शरीराला झालेल्या जखमा विसरून रात्री गाढ झोपी जातात. सकाळी ताजेतवाने बनून पंढरपूरचा रस्ता धरतात. चालताना तो पक्वान्नाचे जेवण विसरतो, कुटुंबाची माया विसरतो, आपली कष्टाने पेरलेली शेती विसरतो.
पाणी मिळेल तिथे डुबकी मारतो, घरातले गादी, कॉट विसरून धुळीने माखलेल्या जमिनीवर झोपतो. चालताना गावागावांतील भक्तांनी दिलेली फळे, फराळ गोड मानून विठ्ठलाचे नाव घेऊन खातो. आणि पंधरा, वीस दिवसांच्या चालीने वारी दिव्य पूर्ण करून सर्वांचे रक्षण करणाऱ्या त्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. आपल्या दोन डोळ्यांनी त्याचे मुख पाहून धन्यता मानतात.
इतिहासाचा मागोवा घेतला असता इसवी सनाच्या सहाव्या शतकात राष्ट्रकुट राजवटीतील ताम्रपटात या भगवंताची नोंद सापडते. बाराव्या शतकात हेमाड पंथियांनी या देवालयाचे बांधकाम केले असल्याचे इतिहासकार मानतात. विठ्ठलाच्या मंदिराला सिमेंट चुन्याचा वापर न करता दगडात दगड गुंफूंन त्याची उभारणी केली आहे.
असेच केदारनाथ देवळाचे बांधकाम केले आहे, होयसळ राजवटीतील राजा विष्णू वर्धन यांनी विठ्ठलाचे देऊळ उभारले असे म्हटले जाते.विठ्ठलाची मूर्ती तीन फूट उंचीची असून त्याच्या शिरावर असलेली टोपी म्हणजे महेश्वराचे लिंग असल्याने त्या विठ्ठलाचे शैव आणि वैष्णव दोन्ही पंथ एकत्र येऊन त्याचे भक्त झाले. म्हणजे त्या विठ्ठलाने भिन्न पंथियानाच नव्हे तर बहुजनांना एकत्र करून वाळवंटीत गुढी उभारण्याचे बळ दिले आहे.
पुढे चौदाव्या शतकात विठ्ठलमूर्ती विजयनगराचे राजे कृष्णदेवराय यांनी पंढरपूरातून कर्नाटकातील हम्पीला नेऊन तुंगभद्रा नदीकाठी विशाल मंदिर उभारून तिथे प्रतिष्ठापना केली, म्हणून भक्त त्याला कानडा विठ्ठल म्हणू लागले. मात्र, पंढरपूरात विठ्ठल नसल्याने सारा महाराष्ट्र त्याच्या दर्शनाविना पोरका झाला. नंतरच्या काळात चमत्कार झाल्याप्रमाणे संत एकनाथांचे पणजोबा भानुदास विठ्ठलाचे निस्सीम भक्त असल्याने ते हम्पीला जाऊन राजा कृष्णदेवरायांची भेट घेऊन विठ्ठलाची मूर्ती परत
आणण्यासंबंधी विनवणी केली. राजांना समजावून त्यांच्या परवानगीने मूर्ती पंढरपूरात परत आणून विधिवत स्थापना केली. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशहांचा सरदार अफजलखान याने पंढरपुरावर हल्ला करून देवळाची काही प्रमाणात मोडतोड केली. त्या भीतीने विठ्ठलाचे पुजारी प्रल्हाद बडवे यांनी गुपचूपपणे ती माढा ठिकाणी नेऊन लपवली तरी सुरक्षिततेच्या विचाराने त्या गावचे विठ्ठलाचे दुसरे भक्त सूर्याजी पाटील यांनी मूर्ती आपल्या शेतमळ्यातील खोल विहिरीत लपवून ठेवली.
अशा या विठ्ठलाच्या इतिहासात अनेक चमत्कार घडले आहे, पुंडलिकाच्या घरी जाऊन विटेवर उभा राहिला मिराबाईचे दळण दळले, दामाजीच्या घरी पाणी भरले, ज्ञानेश्वराला ज्ञानाचा राजा केला, तुकारामाचे अभंग इंद्रायणीतून अलगद वर आणले, संत सखूच्या भक्तीला प्रसन्न झाला, कान्होपात्रेला आपल्या देवळाशेजारी वृक्षरूपात ठेवले. नामदेवांना प्रसन्न होऊन आपल्या चरणी पायरी रूपात ठेवला, गोरा कुंभार, सावता माळी अशा भक्तांना प्रसन्न होऊन भक्तीचा मार्ग दाखवला. सोपान, निवृत्ती, मुक्ताबाई या भावंडाना संत पदवी देऊन सत्याचा मार्ग दाखवला.
कैक थोर संतानी विठ्ठलाची भक्ती केल्याने त्यांना आपले रूप दाखवून प्रसन्न झाला. त्या विठ्ठलाकडे त्यांनी काहीच मागितले नाही. त्यांनी विठ्ठलाच्या भक्तिमार्गाने शैव आणि वैष्णव पंथियाना एकत्र आणून वारी हा एकोप्याचा मार्ग दाखवला. पुंडलिकाने फेकलेली वीट विठ्ठलाने देव बनविली. रात्री झोपून सकाळी उठताच जमिनीला पाय लागून मातीचा स्पर्श होतो.
गोरा कुंभार म्हणतो अहंकाराने माती तुडवल्यास माणसाची माती व्हायला वेळ लागत नाही. माती सगळ्या सजीवांवर दया करून विश्वात उभा रहायला जागा देते. जगण्यास अन्न देते, सजण्यास रंग देते, निसर्गरूपी सेवा केल्याने शक्ती देते. शेकडो वर्षे चालत आलेली ही आषाढी एकादशीची वारी जशी सफेद आणि भगव्या गुढ्यांनी पंढरपुरातील चंद्रभागेचा परिसर फुलवते, तसाच या महिन्यात निसर्ग बहरतो.
गुढी उभारून नाचत विठ्ठलाच्या दारात पोहचून त्याचे प्रेमभराने दर्शन घेताना, गळ्यात दिसणारी तुळशीमाळ, कपाळीचा चंदन टिळा, कासे पितांबर नेसलेला विठ्ठल पाहून चैतन्याचा दिवा पाहिल्याचा भास होतो. दक्षिणेतील रामगिरी पर्वताला आषाढात धडक देणारा तो काळाकुट्ट ढग फुटून त्यातून ओघळणाऱ्या मोत्याच्या स्नानाने तो हरी न्हाऊन जातो, त्या मोत्यांनी रुक्मिणीरूप भूमी ओलावते.
तिच्यावर वारकऱ्यांनी पेरलेल्या दाण्यांना हिरवे कोंब फुटून ती आषाढी एकादशीला पाचूचा शालू नेसून सजल्याने वारकरी आनंदाने गुढी घेऊन पंढरपुरात नाचतात. कैक शतकांपासून चालणारी वारी मनाला आनंद आणि समाधान देते. परमात्म्याचा साक्षात्कार होऊन जाणारी विठ्ठलाची ही चैतन्यभूमी म्हणजे पंढरपूर आहे. तिथे राहून तो सर्वांचे रक्षण करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.