

सृष्टीसौंदर्याने नटलेला ‘आगोंद'' हा गाव कुशावती जिल्ह्यातील काणकोण तालुक्यात वसलेला आहे. तो चावडीपासून आठ किमी. अंतारावर आहे. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेला हा गाव. या गावात येण्यासाठी आणखी दोन रस्ते आहेत. करमल घाट उतरल्यानंतर गुळेहून उजवीकडे रस्ता जातो त्या रस्त्याने आगोंदला पोहोचण्यास चार किमी. अंतर लागते, तर दुसऱ्या बाजूने चिंचीणी बेतूल खणगिणी खोलामार्गे रस्ता आहे.
आगोंदला आगोंदेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे. श्रीस्थळाच्या श्रीमल्लिकार्जुन देवस्थानच्या अखत्यारीतील हे मंदिर असून या मंदिराचा जीर्णाद्धार आणि प्रतिष्ठापना सोहळा अलिकडेच मोठ्या उत्साहाने पार पडला. तेथे निर्गुणादेवी, रंजनी पायक हनूमान, गणपती व विठोबा मंदिर आहे. मुडकुड येथे लाखणेश्वर देवाचे मंदिर असून आगोंद किनाऱ्यालगत सेंट ॲनीस चर्च आहे.
आगोंदला नूतन मराठी विद्यालय ही संस्था आहे. ८० वर्षांपूर्वीच काणकोण महालात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. सेंत्रु प्रोमोतर व इन्स्तुसांव या संस्थेतर्फे सुरवातीच्या काळात काही ठिकाणी मराठी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यात आगोंद हे गाव होते. त्या शाळेला नूतन मराठी विद्यालय हे नाव देण्यात आले. मुक्तीनंतर येथे सरकारी निमसरकारी शाळा झाल्या, परंतू नूतन मराठी विद्यालयाने वार्षिक शारदोत्सव आपल्या वास्तूत साजरा करण्याचा उपक्रम चालूच ठेवला आहे.
आगोंदचे लोक हे नाट्यवेडे असून श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या रंगमंचावार नाटके होतात. आगोंदच्या नूतन नाट्यसंपदेचे ऐतिहासिक नाटक असले म्हणजे काणकोणातील सर्व भागातील लोकांची गर्दी असे.आगोंदातील लोकसंस्कृती शिमगोत्सवाच्या रुपाने अबाधित राहिली आहे. आगोंदात शिमगोत्सव मोठ्या उत्सहाने साजरा करतात. यावेळी घरोघरी खेळण्यासाठी ‘मेळ’ बाहेर पडतो. ढोल, घुमट, शामेळ, ताशा, झांज कसाळे, जघांट या वाद्यांच्या संगीतात प्रत्येकाच्या अंगाणात आपली कला सादर करतात.
नंतर पौष महिन्यात स्त्रियांचा धालो हा लोक नृत्यप्रकार उत्साहपूर्ण वातावरणात सादर करतात. गणेशचतुर्थी म्हणजे आनंद व उत्साहाचा सण. पण हिंदू धर्मीय असूनही आगोंदातील गोमंतक क्षत्रिय मराठा समाजातील किंदळेकर कुटुंबीयांना मात्र हा सण साजरा करण्याचे भाग्य लाभत नाही, तेही परंपरेमुळे. वयोवृद्ध मंडळींनी सांगितल्या गोष्टीनुसार, किंदळेकर घराण्यातील वडीलधारी माणसे फुलपत्री आणण्यासाठी पहाटे उठून जंगलात गेली.
फूलपत्री काढता काढ़ता प्रत्येक जण वेगळ्या वाटेने गेले. पुन्हा सर्वजण एकत्र आल्यानंतर एक व्यक्ती दिसली नाही, शोधाशोध झाली, परंतु बेपत्ता व्यक्ती न सापडल्याने किंदळेकर कुटुंबीयांनी त्यावर्षी गणेशमूर्ती पूजली नाही. बेपत्ता व्यक्ती तिसऱ्या दिवशी गावात आली, पण गणेश प्रतिष्ठापना झाली नाही व परंपरा चालू राहिली.
श्री मल्लिकार्जुन देवस्थानाच्या तरंगाचे मेळ आगोंदला फाल्गुन पौर्णिमेला येतात. येथे देवाच्या गड्यांना अवसर येऊन भाविकांना कौलप्रसाद देण्यात येतो. त्यानंतर रात्री प्रत्येक कुटुंबीयांतर्फे तरंगांची पूजा करतात. आगोंद येथे नयनरम्य किनारा आहे. आगोंदचा विकास व्हावा म्हणून स्थानिकांनी सीमा हॉटेल कंपनीस हजारो चौ.मी. जागा दिली होती, परंतु आजवर तिथे तारांकीत हॉटेल झाले नाही. विकासात मागे तरी, आगोंद गाव मला प्यारा आहे.
रत्नाकर विठ्ठल देसाई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.