

मिलिंद म्हाडगुत
गुरुवार दि. ०६ नोव्हेंबर रोजी सुलक्षणा पंडित गेली. सुलक्षणा म्हणजे सत्तर-ऐंशीच्या दशकातील एक आघाडीची अभिनेत्री. पण एवढीच तिची ओळख होत नाही. ती एक चांगली गायिकाही होती. पण बॉलिवुडातील राजकारणामुळे ती गायिका म्हणून तेवढी उंची गाठू शकली नाही.
तरीही तिने गायलेली अनेक गाणी आजही ऐकाविशी वाटतात. ‘बेकरार दिल तू गाए जा’( दूर का राही), ‘मौसम मौसम’(थोडीसी बेवफाई), ‘तू ही सागर तू ही किनारा’(संकल्प), ‘सोमवार को हम मिले’(अपनापन), ‘जिसके लिये सबको छोडा’(साजन की सहेली), ‘जाने कहां है’(चलते चलते) यांसारखी तिने गायलेली गाणी आजसुद्धा तेवढीच हिट आहेत.
ती चांगली अभिनेत्रीही होती. ‘उलझन’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. त्यात तिचा नायक होता संजीव कुमार. हा चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी ठरल्यामुळे सुलक्षणाही गाजायला लागली.
शशी कपुरबरोबरचे ‘फॉंसी’ व ‘सलाखें’ विशेष चालले नसले तरी १९७६साली अमिताभ बच्चन- विनोद खन्ना बरोबरचा ‘हेराफेरी’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. जितेंद्रबरोबरचे ‘संकोच’ व ‘खानदान’ हे चित्रपटही हिट ठरले.
सर्वांत यशस्वी ठरला तो १९७७साली प्रदर्शित झालेला जितेंद्र बरोबरचा ‘अपनापन’! त्यातले ‘सोमवार को हम मिले’ हे प्रणयी गाणे आजसुद्धा लोकांच्या ओठावर खेळताना दिसत आहे. बरोबर रीना रॉयसारखी मोठी अभिनेत्री असूनसुद्धा बाजी मारली होती ती सुलक्षणानेच. १९८१साली प्रदर्शित झालेला तिचा संजीव कुमारबरोबरचा ’वक्त की दिवार’ हा चित्रपटही त्या काळात चांगला यशस्वी ठरला होता.
त्यातले संजीव कुमार व तिच्यावर चित्रित केलेले ’मन चाहा लडका कोई मिल जाये तो अपना भी शादी का इरादा है’ हे गाणे तर तुफान लोकप्रिय ठरले होते. आणि सुलक्षणाचा इरादाही तोच होता! तिला संजीव कुमारबरोबरच लग्न करायचे होते.
पण संजीव कुमारने तिचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यामुळे सुलक्षणा खचली. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी संजीव कुमारचे निधन झाल्यानंतर तर सुलक्षणा डिप्रेशनमध्ये गेली. योगायोग म्हणजे ’दो वक्त की रोटी’ हा संजीव कुमारबरोबरचा त्याच्या मरणोत्तर प्रदर्शित झालेला चित्रपटात तिचा शेवटचा चित्रपट ठरला.
त्यानंतर गेली सदतीस वर्षे ती रुपेरी पडद्यापासून दूर होती. पण तरीही तिने चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान खचितच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. सुलक्षणाने त्यावेळच्या जवळजवळ सर्व आघाडीच्या नायकांबरोबर काम केले.
‘राजा’(ऋषी कपूर), ‘बंडलबाज’(राजेश खन्ना), ‘थीफ ऑफ बगदाद’(शत्रुघ्न सिन्हा), ‘शंकर शंभू’(फिरोज खान), ‘गरम खून’(विनोद खन्ना), ‘अमर शक्ती’(शशी कपूर) अशा चित्रपटातून तिने त्या काळच्या आघाडीच्या नायकांबरोबर आपली जोडी जमविली होती. पण तिची खरी जोडी जमली ती संजीव कुमार व जितेंद्रशीच! १९८२साली प्रदर्शित झालेला जितेंद्रबरोबरचा तिचा ‘धरम काटा’ हा मल्टिस्टारर चित्रपट तर त्या काळात सुपरहिट ठरला होता. गायिका म्हणूनही ती नंतर चमकू शकली नाही.
तिच्यावर चित्रित केलेली गाणी इतर गायिकांना देण्यात येऊ लागली. यामुळे सुलक्षणाचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले व त्यातून ती आजारी पडू लागली. गेली वीस वर्षे ती आजारीच होती. लग्न न झाल्यामुळे ती बहीण विजयता पंडितबरोबर राहत होती.
आणि तिने हे जग सोडण्याकरता दिवस शोधला तोही ०६ नोव्हेंबरच. याच दिवशी चाळीस वर्षांपूर्वी संजीव कुमारनेही या जगाला अलविदा केले होते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात संजीव व सुलक्षणा एकत्र येऊ शकली नसली तरी दोघांचाही स्मृतिदिन एकाच दिवशी आला असल्यामुळे या दिवशी दोघांचीही एकत्र याद केली जाणार आहे.
यालाच म्हणतात ’अजब प्रेम की अजब दास्तान’! या एके काळच्या गोड गळ्याच्या खुबसुरत अभिनेत्रीच्या स्मृतींना वंदन करताना तिने गायलेले आणि तिच्यावर चित्रित झालेले तसेच तिच्याच जीवनाचे सार सांगणारे ’उलझन’ चित्रपटातील गाणे याद यायला लागते. अपने जीवन की उलझन को कैसे मै सुलझाऊं? बीच भंवरमे नाव है मेरी कैसे पार लगाऊं?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.