
प्रत्येकाच्या घरात चवथीची म्हणजेच गणपतीची धुमधाम सुरू असणार. गणपतीची प्राणप्रतिष्ठा होऊन गणपती बाप्पा नेवरी - मोदक खाऊन तृप्तदेखील झाले असतील. रांधच्या कुडीतून (स्वयंपाकघरातून) विविध पदार्थांचा सुवास येत असणार.
मनाला सुखावणारं, उत्साहित करणारं वातावरण पुढचे काही दिवस अनुभवायला मिळणार. चवथीला सर्वात जास्त महत्त्व ते रांधच्या कुडीला. घरातील समस्त महिला या दिवसात एका ठिकाणी भेटू शकतील ते ठिकाण म्हणजे रांधची कुड.
त्यांची लगबग बघण्यासारखी असते. यावेळी एकमेकींशी निवांतपणे गप्पा मारायला त्यांना नसला तरी मध्येच चवथीसाठी कोणती नवी साडी घेतली, कोणता नवा दागिना केला याचं थोडंसं मिरवणं सुरू असतं. एकूण काय सगळं कुटुंब उत्सवी वातावरणात रमून जातं.
गणपती विराजमान होण्याआधी किमान आठवडाभर तरी रांधच्या कुडीचं व्यवस्थापन सुरू होतं. खास चवथीसाठी म्हणून वेगळा किराणामाल भरावा लागतो, कोणाच्या घरी दीड दिवस, कोणाच्या घरी पाच दिवस तर कोणाच्या घरी अकरा आणि एकवीस दिवस अशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.
हे दिवस डोळ्यांसमोर ठेवून घरातील महिला या दिवसांतील स्वयंपाकाचं सुंदर व्यवस्थापन करतात. प्रत्येक दिवशी वेगळा नैवेद्य असतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी नैवेद्यात वेगवेगळे पदार्थ असतात. ताटातले पदार्थ बघूनच पोट भरून जातं. नुस्त्यांवर ताव मारणारी मंडळी गणपती बाप्पा घरी येताच पूर्णपणे शाकाहारी बनतात.
महाराष्ट्रात गणपती म्हटले की डोळ्यासमोर ’मोदक’ हाच पदार्थ येतो, इतकं त्यांचं घट्ट समीकरण तयार झालंय. पण इथं मात्र जरा वेगळं आहे. गोवा प्रत्येक गोष्टीत आपलं वेगळेपण जपतो तसं गणपतीतील खाद्यपदार्थांमध्येही वेगळेपण जपलं आहे.
इथं गणपतीला मोदक नाही तर नेवऱ्यांचा नैवेद्य असतो. सगळीकडे गणपती आणि मोदक असं समीकरण प्रचलित असताना. गणपती आणि नेवऱ्या यांचं समीकरण कसं जुळलं असणार? मोदक नाही तर नेवऱ्या कशा आल्या असतील? एक उत्सुकता म्हणून अशा प्रश्नांची उत्तर मी अजून शोधात आहे.
गणपतीच्या सगळ्या धावपळीच्या दिवसात नेवऱ्या करणं हे एक मोठं कामं असतं. नेवऱ्यासाठी पीठ भिजवणं, आतलं चुन्न (सारण) तयार करणं असं एकेक करून तयारी सुरू होते. मग घरातील समस्त महिला मंडळ सोयीची वेळ बघून नेवऱ्या बनवायला घेतात.
काहीजणी नेवऱ्याचं पातं लाटायला घेतात तर काहीजणी त्यात चुन्न भरतात मग दोघीजणींवर नेवऱ्या तळण्याची जबाबदारी असते. हे सगळं वातावरण अतिशय अनुभवावं असं असतं. गप्पाटप्पांमध्ये, हसत खेळत कधी नेवऱ्या लाटून - तळून तयार होतात ते कळत नाही.
या गडबडीत घरातील बच्चे कंपनीच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलंच. त्यांना गरम गरम नेवरी खाण्याची नेमकी हुक्की येते. मग घरातील आजी - पणजीचा मागून आवाज येतो की ’अरे त्या नैवेद्याच्या आहेत. त्या नेवऱ्यांना हात लावू नका.’ पण आजी-पणजीचा डोळा चुकवून नेवरी गट्टम होतेच.
नेवरीला खास या भागाची, या प्रांताची चव आहे. ही फक्त गोड नाही तर तिखट, गोड आणि तिखट मिश्रण असलेली अशा वेगवेगळ्या चवींची बनवली जाते. किमान चार - प्रकारच्या वेगवेगळ्या चवीच्या नेवऱ्या या काळात खायला मिळतात.
गूळ घालून, साखर घालून केलेलं सारण, मग तीळ, खोबरं, लाल तिखट घालून केलेलं तिखट सारण, याच सारणात थोडा गूळ घालून तिखट-गोड चवीच्या नेवऱ्या, पुरणाचं सारण घालून नेवऱ्या बनवल्या जातात.
गणपतीचं दर्शन घ्यायला आल्या गेलेल्यांना प्रसाद म्हणूनदेखील याच नेवऱ्या दिल्या जातात. बचतगट आणि महिला मंडळ यांना या काळात नेवऱ्याच्या निमित्ताने एक छान व्यवसाय मिळाला आहे. नोकरीत व्यग्र असणाऱ्या महिला आता नैवेद्यापुरत्या नेवऱ्या घरी बनवतात आणि आल्या - गेलेल्यांना बचतगट अथवा गृहउद्योगातून विकत आणलेल्या नेवऱ्या दिल्या जातात.
घरातील महिलांची पिढी आपापल्या घरातील खाद्यपरंपरा पुढे चालवते. आई, सासू, काकी, मामी, आत्या अशा महिलांच्या तालमीत तयार होऊन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हीच खाद्यपरंपरा पुढे नेते. चवथ आणि नेवरी यांचं घट्ट नातं आहे. नेवरीची खाद्यपरंपरा जपणारे आणि नेवरी आवडीने खाणारे हातदेखील तितकेच महत्वाचे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.