

WHO Food Safety Report: अनेकदा आपण घाईगडबडीत किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्यावरील किंवा अस्वच्छ ठिकाणचे अन्न खातो, परंतु हे खाणे आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक रिपोर्ट जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला. डब्लूएचओच्या ताज्या अंदाजानुसार, दूषित आणि अस्वच्छ अन्नामुळे जगभरात दरवर्षी 86 कोटींहून अधिक लोक गंभीर आजारी पडतात, तर तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रिपोर्टमध्ये लहान मुलांच्या आरोग्याबाबत अत्यंत चिंताजनक बाब समोर आली.
पाच वर्षांखालील लहान मुलांना मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत दूषित अन्नामुळे आजारी पडण्याचा धोका जवळपास तीन पटीने जास्त असतो. धक्कादायक बाब म्हणजे, योग्य वेळी स्वच्छ पाणी, स्वच्छता, पाश्चराइज्ड अन्न आणि गरिबांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळाल्यास यातील बहुतांश मृत्यू सहज रोखता येणे शक्य आहे. 2000 नंतर अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजारांचे एकूण प्रमाण जागतिक स्तरावर काहीसे कमी झाले असले, तरी आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये याचे प्रमाण अजूनही प्रचंड आहे. जगभरातील एकूण आजारांपैकी पाऊण भाग आणि 60 टक्के मृत्यू हे केवळ याच दोन क्षेत्रांमध्ये होतात.
अन्नामधील जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांसारख्या जैविक धोक्यांमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या (2021 मध्ये सुमारे 86 कोटी) जास्त असली, तरी केमिकल म्हणजेच रासायनिक धोक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वात भयानक आहे. 2021 मधील आकडेवारीनुसार, दूषित अन्नामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 73 टक्के मृत्यू हे अन्नातील रसायनांमुळे झाले होते. यामध्ये प्रामुख्याने इनऑर्गेनिक आर्सेनिक (42%) आणि लेड म्हणजेच शिसे (31%) यांचा समावेश होता. या घातक रसायनांमुळे मानवी शरीरात कर्करोग (Cancer), हृदयविकार आणि मानसिक कमकुवतपणाचा धोका कमालीचा वाढतो. या आरोग्यावरील दुष्परिणामांशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसला.
2021 मध्ये अन्नजन्य आजारांमुळे उत्पादकतेत सुमारे 310 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले, जे राहणीमानाच्या खर्चानुसार समायोजित केल्यास 647 अब्ज डॉलर्सवर पोहोचते.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अॅडहॉम घेब्रेयसस यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अन्न सुरक्षा हा कोणताही छोटा मुद्दा नसून तो प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. असुरक्षित अन्न ही नेहमीच एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या राहिली आहे, परंतु यापूर्वी तिचे मानवी आणि आर्थिक नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणावर समोर आले नव्हते. पहिल्यांदाच देशांकडे स्वतःची आकडेवारी उपलब्ध असल्याने सरकार आता या समस्येचे मूळ ओळखून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊ शकते.
अन्नातील आर्सेनिक, लेड आणि मिथाईल मर्क्युरी सारखी घातक रसायने नैसर्गिक स्त्रोतांमुळे किंवा मानवी चुकांमुळे अन्न साखळीत (Food Chain) समाविष्ट होतात. एकदा ही रसायने अन्नात मिसळली की त्यांना बाहेर काढणे अशक्य होते. मिथाईल मर्क्युरीसारखे रसायन लहान मुलांच्या मेंदूच्या विकासाला कायमची हानी पोहोचवू शकते. त्यामुळे अन्न दूषित होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने शेतीच्या चांगल्या पद्धती, कडक औद्योगिक नियम आणि मजबूत पर्यावरणीय कायदे स्त्रोतावरच लागू करावेत, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.