
Pakistan Defense Minister Controversial Statement: सध्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्येही मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुराने लोकांची अवस्था बिकट झाली आहे. पुराच्या पाण्यात अनेक गावे वाहून गेली असून लाखो लोक बेघर झाले आहेत. अशा भयानक परिस्थितीत जर देशाचा संरक्षण मंत्री (Defence Minister) हा पूर आपल्यासाठी ‘आशीर्वाद’ आहे असे सांगत असेल तर तेथील लोकांची काय प्रतिक्रिया असेल, याची कल्पनाच केलेली बरी. सध्या सोशल मीडियावर (Social Media) पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) एका वृत्तवाहिनीवर पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची क्लिप दाखवली जात आहे. याचवेळी अँकरसोबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ फोनद्वारे जोडले गेले आहेत. या संभाषणादरम्यान ते म्हणतात, “हे जे पुराचे पाणी आहे, ते आपण साठवून ठेवावे. जे लोक रस्त्यावर बसले आहेत, त्यांनी हे पाणी आपल्या बादल्या आणि टबमध्ये घेऊन जावे आणि साठवून ठेवावे.” पुढे ते म्हणाले, “हे जे पाणी आहे त्याला आपण ‘आशीर्वाद’ मानले पाहिजे आणि ते साठवण्यासाठी मोठे धरणे (डॅम) बनवायला हवेत, ज्यामुळे पाणी अडवता येईल. अशाप्रकारे 8-10 धरणे बांधली पाहिजेत.”
ख्वाजा आसिफ यांच्या या संतापजनक विधानानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. हा व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ocjain4 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी विनाशकारी पुराला अल्लाहची कृपा म्हटले. तसेच, लोकांना पुराचे पाणी बादली आणि टबमध्ये जमा करण्यास सांगितले,” असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने म्हटले की, “पाकिस्तानी लोकांची विचारसरणी पाहा विनोद (विनोद, देख रहे हो पाकिस्तान वालों की सोच)!” दुसऱ्या युजरने लिहिले, “पाकिस्तानकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, तो अजून काय करणार?” आणखी एका युजरने व्यंग्यात्मक टिप्पणी करत म्हटले, “यांच्या बुद्धिमत्तेला काय म्हणावे? शेवटी वैज्ञानिक लोक आहेत.” तर एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, “पाकिस्तानचे संरक्षण मंत्री बिचारे मानसिक रुग्ण झाले आहेत.”
सध्याच्या पुरामुळे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये स्थिती अत्यंत गंभीर आहे. शेकडो गावांना जलसमाधी मिळाली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. लाखो लोक मदतकार्याच्या प्रतीक्षेत असताना एका जबाबदार मंत्र्याने असे असंवेदनशील विधान करणे हे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
ख्वाजा आसिफ यांच्या या विधानावरुन हे स्पष्ट होते की, त्यांना जनतेच्या दुर्दशेची फारशी कल्पना नाही. अशा गंभीर संकटाच्या काळात जनतेला धीर देण्याऐवजी आणि ठोस उपाययोजनांची चर्चा करण्याऐवजी त्यांनी केलेले हे विधान त्यांच्या सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे. पाकिस्तानमधील नागरिकांची स्थिती आधीच अस्थिर आहे आणि अशा विधानांमुळे त्यांचा संताप वाढणे स्वाभाविक आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे, जिथे एक छोटेसे विधानही क्षणार्धात व्हायरल होऊन नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.