
Pakistan FM Ishaq Dar On Operation Sindoor: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी जाहीरपणे स्वीकारले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान युद्धबंदी (Ceasefire) चा प्रस्ताव अमेरिकेकडून आला होता, परंतु भारताने तो साफ नाकारला. दार यांच्या या वक्तव्याने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाक संबंधांमध्ये मध्यस्थी करण्याच्या दाव्याची हवाच निघाली. दार यांच्या या कबुलीने भारत आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
इशाक दार यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. दार यांनी सांगितले की, पाकिस्तानने (Pakistan) अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याकडे ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भारताची सुरुवातीपासूनच ही भूमिका राहिली आहे की, भारत-पाकिस्तानचे सर्व मुद्दे ‘द्विपक्षीय’ (Bilateral) आहेत आणि त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही.
दार यांनी पुढे बोलताना सांगितले की, भारत-पाक संबंधांवर अमेरिकेशी दोनदा चर्चा झाली. 10 मे रोजी सकाळी 8:17 वाजता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी त्यांना सांगितले होते की, लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये एका तटस्थ ठिकाणी चर्चा होईल. यामुळे पाकिस्तानमध्ये चर्चेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, नंतर 25 जुलै रोजी वॉशिंग्टनमध्ये त्यांची पुन्हा रुबियो यांच्याशी भेट झाली, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलली. रुबियो यांनी सांगितले की, भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या भूमिकेचा स्पष्टपणे इन्कार केला असून हे प्रकरण केवळ द्विपक्षीय असल्याचे म्हटले.
दुसरीकडे, हे वक्तव्य पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण पाकिस्तान गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून काश्मीरसह इतर मुद्द्यांवर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे, पण भारताने प्रत्येक वेळी त्याची ही खेळी हाणून पाडली आहे.
दार यांनी पुढे बोलताना सांगितले की, पाकिस्तानला तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची कोणतीही अडचण नाही. आम्ही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीपासून मागे हटत नाही, पण भारत नेहमीच हा द्विपक्षीय मुद्दा आहे, असे सांगतो. जेव्हा रुबियो यांच्या माध्यमातून युद्धबंदीचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्हाला आश्वासन देण्यात आले की भारतासोबत चर्चा होईल, पण नंतर सांगण्यात आले की भारताने साफ नकार दिला आहे.”
दार यांनी पुढे बोलताना द्विपक्षीय चर्चेसाठीही तयारी दर्शवली. ते म्हणाले की, “आमची द्विपक्षीय चर्चेलाही कोणतीही हरकत नाही, पण ती चर्चा व्यापक (Comprehensive) असावी.'' यात केवळ एकाच मुद्द्यावर चर्चा न करता दहशतवाद, व्यापार, अर्थव्यवस्था, जम्मू-काश्मीर यांसारख्या सर्व विषयांवर दोन्ही देशांनी चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दार यांनी आपल्या वक्तव्यातून पाकिस्तानची सध्याची अवस्थाही स्पष्ट केली. ते म्हणाले, "आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी भीक मागत नाही. जर कोणत्याही देशाला चर्चा करायची असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही एक शांतताप्रिय देश आहोत. आमचा विश्वास आहे की, पुढे जाण्याचा एकमेव मार्ग संवाद आहे."
याच वाक्यातून त्यांनी भारताच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. “संवादासाठी दोन लोकांची इच्छा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत भारताची चर्चेची तयारी नाही, तोपर्यंत ते शक्य होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दार यांच्या या वक्तव्यामुळे भारताची (India) ‘दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत’ ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मजबूत झाली. पाकिस्तानचे उच्च-स्तरीय अधिकारीच जाहीरपणे भारताच्या ठाम भूमिकेची कबुली देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.