
PM Modi On Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार (10 ऑगस्ट) बंगळुरु येथे शहराला अधिक मजबूत कनेक्टिव्हिटी देणाऱ्या अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी येथील मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन केले. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना, त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचे श्रेय देशाच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणाला दिले आणि 'नव्या भारता'ची वाढती ताकद अधोरेखित केली.
पंतप्रधानांनी 'नेक्स्ट-जेन मोबिलिटी फॉर ए नेक्स्ट-जेन सिटी' या कार्यक्रमात कन्नड भाषेत काही वाक्ये बोलून आपल्या भाषणाची सुरुवात केली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आपण पहिल्यांदाच बंगळुरुत आलो आहोत, असे ते म्हणाले. या ऑपरेशनच्या यशामागे 'मेक इन इंडिया'ची संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ताकद आहे. यात कर्नाटकच्या तरुणांचे मोठे योगदान आहे, असे सांगत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने (Indian Army) सीमापार अनेक किलोमीटरपर्यंत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करुन ताकद दाखवली. तसेच, दहशतवाद्यांच्या बचावासाठी आलेल्या पाकिस्तानला काही तासांतच गुडघे टेकवण्यास भाग पाडले. नव्या भारताच्या या ताकदीचा अनुभव संपूर्ण जगाने घेतला."
पुढे बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर (Economy) भर दिला. पंतप्रधान म्हणाले, "भारत 10व्या क्रमांकावरुन 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आणि लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत."
विकसित भारताचा हा प्रवास 'डिजिटल इंडिया' सोबतच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. 'इंडिया एआय मिशन' सारख्या योजनांमुळे भारत 'ग्लोबल एआय लीडरशिप'च्या दिशेने पुढे जात आहे. तसेच, 'सेमीकंडक्टर मिशन'नेही वेग घेतला असून, देशाला लवकरच 'मेड इन इंडिया चिप' मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. भारताने 'लो कॉस्ट, हाय टेक स्पेस मिशन'चे जागतिक उदाहरण समोर ठेवले आहे, असेही ते म्हणाले.
देशातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो नेटवर्क असलेला देश बनला आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणातही मोठी प्रगती झाली आहे. 2014 पूर्वी सुमारे 20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते, तर गेल्या 11 वर्षांत हा आकडा दुप्पट होऊन 40 हजार किलोमीटरपेक्षा जास्त झाला आहे. 2014 मध्ये देशात फक्त 74 विमानतळे कार्यरत होती, जी आता 160 पेक्षा जास्त झाली आहेत. जलमार्गांची संख्याही 3 वरुन 30 झाली आहे.
दुसरीकडे, या सर्व उपलब्धींनंतर आता आपली पुढची मोठी प्राथमिकता 'टेक आत्मनिर्भर भारत' असली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. 'इंडियन टेक कंपन्यांनी' जगभरात आपली छाप सोडली आहे. पण आता भारताच्या गरजांना अधिक प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येऊन देशाच्या कल्याणासाठी काम करण्याचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.