

Terrorist Abdul Rauf: पाकिस्तानस्थित जगातील सर्वात घातक दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'ने (LeT) अखेर भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती स्वीकारली. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा येथे आयोजित 29व्या दीक्षांत समारंभात बोलताना भारताचा हा हल्ला सर्वात मोठा आणि प्राणघातक होता, अशी जाहीर कबुली दिली. रऊफच्या या वक्तव्यामुळे भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादाच्या मुळावर कसा घाव घातला होता, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
लष्कर कमांडर अब्दुल रऊफ, ज्याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे, त्याने आपल्या भाषणात म्हटले की, "6-7 मे रोजी मुरीदकेमध्ये जे काही घडले, ते अत्यंत भयावह होते. भारताचे 'ऑपरेशन सिंदूर' हा आमच्यावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. मशिदीला लक्ष्य करुन ती उद्ध्वस्त करण्यात आली. अल्लाहनेच आम्हाला वाचवले, कारण त्यावेळी मुले तिथे नव्हती, त्यांना त्यांच्या शुभचिंतकांनी आधीच तिथून हलवले होते." रऊफच्या या वक्तव्यावरुन भारतीय गुप्तचर यंत्रणांचे नेटवर्क किती मजबूत होते आणि हल्ल्याची अचूकता किती तीव्र होती, हे पुन्हा स्पष्ट झाले.
एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करुन 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या रक्ताळलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6 आणि 7 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) 9 प्रमुख दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले चढवले. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचे मुरीदके येथील मुख्यालय 'मरकझ-ए-तैयबा' आणि जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर येथील तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात लष्करचा मुरीदके प्रमुख मुदस्सर खडियान खास याच्यासह अनेक उच्चपदस्थ दहशतवादी मारले गेले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंतिम संस्काराची धुरा खुद्द अब्दुल रऊफने सांभाळली होती. विशेष म्हणजे, या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचा दहशतवाद्यांशी असलेला थेट संबंध जागतिक स्तरावर पुन्हा एकदा उघड झाला. रऊफने आपल्या भाषणात या हल्ल्याची भीषणता सांगताना पाकिस्तानची हतबलताही व्यक्त केली.
भारताच्या या धाडसी कारवाईनंतर पाकिस्तानने चिनी क्षेपणास्त्रे आणि तुर्कीच्या ड्रोनचा वापर करुन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. उलट प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 11 लष्करी तळांना 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांनी उडवून दिले. यामुळे तुर्की आणि चीनच्या तंत्रज्ञानाची मोठी नाचक्की झाली. भारतीय लष्कराचा हा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची धाबे दणाणले. अखेर पाकिस्तानने भारतासमोर शस्त्रसंधीची विनवणी केली, ज्यानंतर भारताने आपले ऑपरेशन स्थगित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.