
Thailand Cambodia Border Tension: थायलंड-कंबोडिया सीमेवर (Thailand-Cambodia Border) वाढत्या हिंसाचारामुळे भारतीय दूतावासाने (Indian Embassy) शुक्रवारी (25 जुलै) एक विशेष सूचना (Advisory) जारी केली. यात भारतीयांना थायलंडमधील सात प्रांतांमध्ये प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक महिन्यांपासून तणावपूर्ण असलेल्या या वादग्रस्त सीमावर्ती भागांमध्ये सशस्त्र संघर्षात (Armed Clashes) मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय दूतावासाने निवेदनात म्हटले आहे की, "थायलंड-कंबोडिया सीमेवर असलेल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर, थायलंडला प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना थाई अधिकृत स्रोतांकडून, ज्यात टीएटी न्यूजरुमचा (TAT Newsroom) समावेश आहे, अद्ययावत माहिती तपासण्याचा सल्ला दिला जातो."
दरम्यान, ही सूचना थायलंडचे (Thailand) हंगामी पंतप्रधान फुमथम वेचायाचाई (Phumtham Wechayachai) यांनी पत्रकारांना दिलेल्या गंभीर इशाऱ्यासोबतच जारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, "सध्याची परिस्थिती घुसखोरी आणि आक्रमक कृत्यांशी संबंधित आहे, ज्यामुळे लोकांच्या जीवनाला धोका निर्माण होत आहे. परिस्थिती तीव्र झाली असून ती युद्धाच्या स्थितीत बदलू शकते. सध्या ही अवजड शस्त्रांचा (Heavy Weapons) समावेश असलेली एक गंभीर लढाई आहे."
थाई अधिकाऱ्यांनी उबोन राचथानी (Ubon Ratchathani), सुरिन (Surin), सिसकेट (Sisaket), बुरिराम (Buriram), सा केओ (Sa Kaeo), चंथाबुरी (Chanthaburi) आणि त्राट (Trat) यासह अनेक प्रांतांमधील 20 हून अधिक ठिकाणी प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. या संघर्षात आतापर्यंत किमान 16 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुले आणि एका सैनिकांचा समावेश आहे, तर 15 सैनिक आणि 30 सामान्य नागरिक (Citizens) जखमी झाले आहेत. हजारो लोकांना आपली घरे सोडून पळून जाण्यास भाग पडले आहे.
या युद्धात गोळीबार, तोफखाना आणि रॉकेट हल्ले यांचा समावेश आहे, ज्यात थायलंडने कंबोडियन भूभागावर हवाई हल्ले (Airstrikes) देखील केले आहेत. शुक्रवारी, थाई लष्कराने चार सीमावर्ती प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी संघर्षाच्या घटनांची नोंद केली. थाई लष्कराने दावा केला की, कंबोडियन सैन्याने अवजड तोफखाना आणि रशियन बनावटीचे बीएम-21 (BM-21) रॉकेट लॉन्चर वापरले, ज्यामुळे प्रत्युत्तर म्हणून आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागले.
थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) मते, प्रभावित प्रांतांमध्ये 58,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत, तर कंबोडियन अधिकाऱ्यांनी सीमेजवळील भागातून 4,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित केल्याचे म्हटले. मे महिन्यात एका कंबोडियन सैनिकाला गोळ्या घालून ठार केल्यानंतर झालेला हा दुसरा मोठा सशस्त्र संघर्ष आहे. थाई सैनिकांना भू-सुरुंग स्फोटात (Landmine explosion) दुखापत झाल्यानंतर दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध कमी केल्यानंतर काही तासांतच हा नवीन संघर्ष उफाळला. यामुळे दक्षिण-पूर्व आशियातील या दोन देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.