

Maulana Fazlur Rehman Statement: पाकिस्तानचे ज्येष्ठ धार्मिक नेते आणि जमीयत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला घरचा आहेर दिला. अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानने केलेल्या लष्करी कारवाईची तुलना त्यांनी भारताच्या 'ऑपरेशन सिंदूरशी केली.
कराचीमध्ये आयोजित 'मजलिस-ए-इत्तेहाद-ए-उम्मत' परिषदेत बोलताना त्यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. "जर तुम्ही शत्रू तिथे लपले असल्याचे सांगून काबूलवर हल्ला करणे योग्य ठरवत असाल, तर भारत जेव्हा पाकिस्तानात (Pakistan) घुसून आपल्या शत्रूंना लक्ष्य करतो, तेव्हा तुमची प्रतिक्रिया वेगळी का असते?" असा रोखठोक सवाल रहमान यांनी केला.
मौलाना फजलुर रहमान यांनी थेट भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'चा संदर्भ दिला. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी 26 निरपराध नागरिकांची निर्घृण हत्या केली. या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 7 मे 2025 रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा गड आणि मुरीदके येथील लश्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचा समावेश होता.
रहमान यांच्या मते, जर पाकिस्तान आपल्या बचावासाठी अफगाणिस्तानात घुसू शकतो, तर भारतालाही बहावलपूर आणि मुरीदकेमध्ये हल्ले करण्याचा पूर्ण अधिकार उरतो.
जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप नागरिक मारले गेले आहेत. यावर भाष्य करताना रहमान म्हणाले, "तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही अफगाणिस्तानात आमच्या शत्रूंवर हल्ला केला आणि तो योग्य आहे. मग भारत असेही म्हणू शकतो की त्याने काश्मीरमधील हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या गटांच्या मुख्यालयावर हल्ला केला. मग तुम्ही त्यावर आक्षेप कसा घेऊ शकता? जो आरोप आज अफगाणिस्तान पाकिस्तानवर करत आहे, तोच आरोप पाकिस्तान भारतावर करत आला आहे. तुम्ही या दोन्ही गोष्टींचे समर्थन एकाच वेळी कसे काय करु शकता?"
2021 मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे, तर अफगाण सरकार हे आरोप फेटाळून लावते. मौलाना फजलुर रहमान यांनी नेहमीच अफगाणिस्तानप्रती पाकिस्तानच्या धोरणांवर टीका केली. विशेष म्हणजे, ते तालिबानचे सर्वोच्च नेते हैबतुल्लाह अखुंदजादा यांची भेट घेणारे एकमेव पाकिस्तानी खासदार आहेत. त्यांनी यापूर्वीही दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
पाकिस्तानने भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला प्रत्युत्तर म्हणून ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांनी भारतीय शहरे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय लष्कराने यशस्वीरित्या मोडून काढला. आता रहमान यांच्या विधानामुळे पाकिस्तानच्या जागतिक मंचावरील नैतिक भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भारताने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ला पाकिस्तानातूनच समर्थन मिळताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.