

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत ५२ वर्षांनंतर पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. हा विजय फक्त एका सामन्याचा नव्हता, तर भारतीय महिला क्रिकेटच्या संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक होता.
या विजयाबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय दिग्गजांपासून ते परदेशी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी भारतीय महिला संघाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही या ऐतिहासिक यशावर प्रतिक्रिया दिली आणि भारतीय संघाच्या मेहनतीचे कौतुक केले.
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने भारतीय महिला संघाच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन करत भावनिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “भारतीय महिला संघाने पूर्ण स्पर्धेत खेळावर वर्चस्व गाजवले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये त्यांनी अप्रतिम प्रदर्शन केले. त्यांनी प्रथम फलंदाजी केली असो वा प्रथम गोलंदाजी केली असो त्यांनी प्रत्येक वेळेस आपला खेळ जिंकला. ही स्पर्धा जणू ‘टीम इंडिया विरुद्ध उर्वरित जग’ अशी होती.”
अक्रमने पुढे म्हटले की, भारतीय संघाने दाखवलेला आत्मविश्वास आणि निर्धार जगातील इतर संघांसाठी प्रेरणादायी ठरेल. “अशा प्रकारचे विजय वर्षानुवर्षांच्या मेहनतीने मिळतात. हा फक्त क्रिकेटचा विजय नाही, तर महिलांच्या सशक्तीकरणाचाही विजय आहे,” असे ते म्हणाले.
दुसरे माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनेही भारतीय महिला संघाच्या कामगिरीचे मनापासून कौतुक केले. त्याने सोशल मीडियावर लिहिले, “भारताचा विजय हा योगायोग नाही. त्यांच्या क्रिकेट व्यवस्थेने गेल्या काही वर्षांत जबरदस्त प्रगती केली आहे. त्यांची तयारी, त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास आणि त्यांच्या संघभावनेमुळेच हा विजय शक्य झाला.”
अख्तर पुढे म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तान असा खेळायचा. पण आता भारत तो खेळ दाखवत आहे. देश वर येतात आणि खालीही जातात, पण महत्त्वाचे म्हणजे आपण शिकतो का? पाकिस्तान क्रिकेटने हे लक्षात घेतले पाहिजे की शेजारी देश किती वेगाने प्रगती करत आहे. आपण जर बदल केला नाही, तर आपण फक्त इतिहासात क्रिकेट खेळणारा देश म्हणून ओळखले जाऊ.”
भारतीय महिला संघाच्या विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. भारतीय पुरुष संघाचे खेळाडू, बॉलिवूड कलाकार, आणि माजी दिग्गजांनी हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाचे कौतुक केले. बीसीसीआयकडूनही खेळाडूंना विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
हा विजय फक्त ट्रॉफीचा नव्हता, तर भारतीय महिला क्रिकेटच्या ५२ वर्षांच्या प्रवासाचा ‘स्वप्नवत’ शेवट होता. हरमनप्रीत, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, रिचा घोष आणि इतर खेळाडूंनी एकत्र येऊन भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.