
तीन प्रबळ संघाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे मायदेशात सुरू असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झालेल्या भारताचा गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध सामना होत आहे. उपांत्य फेरी गाठायची असेल तर हा सामना जिंकावाच लागणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ उपांत्य फेरी निश्चितच गाठेल, अशी स्पर्धा सुरू होण्याअगोदर शक्यता होती; परंतु आता अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न उभा राहिला आहे. गुरुवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होत आहे.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. अर्थात श्रीलंकाही पूर्णपणे बाहेर गेलेले नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांचे प्रत्येकी पाच सामन्यांतून चार गुण झाले आहेत. गुरुवारचा एकमेकांविरुद्धचा सामना झाल्यानंतर भारत-बांगलादेश आणि न्यूझीलंड-इंग्लंड असे सामने आहेत. गुरुवारचा सामना जिंकला तरी अखेरचा साखळी सामनाही जिंकावाच लागेल.
श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध विजय मिळवणारा भारतीय संघ मातब्बर संघासमोर अपयशी ठरत असल्यामुळे आता संघावर टीका होऊ लागली आहे, त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरला जबाबदारी घेऊन स्वतःसह संघाचीही कामगिरी उंचवावी लागणार आहे.
काय आहे समीकरण?
भारत, न्यूझीलंड प्रत्येकी पाच सामन्यांतून चार गुण
गुरुवारी एकमेकांविरुद्ध लढत
जिंकणाऱ्या संघाचे सहा गुण, तर पराभूत चार गुणांवरच
गुरुवारचा सामना गमावला आणि अखेरचा सामना जिंकला, त्याचवेळी हा सामना जिंकणाऱ्या संघाने अखेरचा सामना गमावला तर भारत- न्यूझीलंडचे पुन्हा समसमान गुण.
सध्याच्या निव्वळ सरासरीत भारत (०.५२५) न्यूझीलंडपेक्षा (-०.२४५) सरस
एकच सामना शिल्लक असलेल्या श्रीलंकेचे जास्तीत जास्त सहा गुण होऊ शकतात; पण हा सामना श्रीलंकेत असून तेथे पावसाचा वारंवार व्यत्यय येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.