
पणजी: दिवाळीतील पहिल्या दिवशी म्हणजेच नरकचतुर्दशीला नरकासुराला जाळण्यापूर्वी पणजी शहरात मंडळांकडून ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघनाच्या घटना घडल्या. त्याविरोधात पोलिसांनी ज्या तत्परतेने कारवाई करणे अपेक्षित होते, ती कारवाई झाली नाही.
त्याचबरोबर रात्रभर दुचाकीस्वारांकडून विना हेल्मेट वाहन चालविणे सुरू होते, त्यावरून वाहतूक नियंत्रण खात्यालाही आपल्या कायद्याचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळीत ठिकठिकाणी नरकासूर पाहण्यासाठी अलीकडे वाहनांवरून फिरणे म्हणजे ट्रेंड झाला आहे, असे दिसते. काही धनदांडगे तर चारचाकी वाहन घेऊन फिरणे हा दिखाऊपणा करीत असल्याचेही चित्र पहायला मिळू लागले आहे.
याशिवाय दरवर्षी अरुंद रस्त्यांवर गर्दी होत असताना वाहतूक नियंत्रण शाखेकडून अजिबात नियोजन केले जात नसल्याचे दिसून आले. रविवारी रात्री पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खरेतर काही नियम आणि येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चित करायला हवा होता.
परंतु तसे न झाल्याने वाहतुकीचे तीन-तेरा वाजले होते. मळा परिसरात फोन्ताइन्हास ते मडकईकर नगरापर्यंत म्हणजे श्रीराम मंदिरापर्यंत दुचाकीवरून येण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागत होता, एवढी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. याशिवाय मळ्यातील रस्त्यांवरही अशीच स्थिती होती.
वाहतूक कोंडी हा आता नित्याचाच प्रकार झाला आहे, पण वाहतूक नियंत्रण शाखेकडून या दिवशी दुचाकीस्वारांना हेल्मेट विना फिरा असा काही संदेश दिला होता की काय, असे वाटते. कारण अनेक दुचाकीस्वार युवक, युवती हेल्मेटचा वापर न करता वाहने हाकत होती. इतरवेळी हेल्मेट घातले नाहीतर वाहतूक पोलिसांकडून हजार रुपयांचा दंड आकारला जातो. मग दिवाळीच्याच दिवशी युवकांना मोकळीक का? की दिवाळी आहे म्हणून सर्व काही तुम्हाला माफ, असा संदेश पोलिस देऊ इच्छितात काय?
आयोजकांविरोधात गुन्हा
पणजी पोलिसांनी नरकासुर स्पर्धेदरम्यान पोलिस कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध कठोर कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांवर ढकलाढकली व गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तक्रारीनुसार, नेवगीनगर, मळा परिसरात ‘प्रिन्स ऑफ मळा’ या आयोजकांनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव तयार केला होता. मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी संगीत थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर आयोजकांनी त्यांना ढकलून दिले व त्यांच्या हालचालींना अडथळा आणला, असा आरोप आहे. या कृतीमुळे पोलिस पथक आपले अधिकृत कर्तव्य पार पाडू शकले नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी १८ जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.